आमदार व शहर भाजपाचे अध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्या भूमिकेकडे व निर्णयाकडे डोळे लावून बसलेल्या शहर भाजपच्या कार्यकर्त्यांमधील चुळबुळीने आज कळस गाठला. ‘आता काय करायचं?’ असे जो तो आता एकमेकांना विचारत आहे. अडचण म्हणजे जगताप हे नुसते आमदार नसून पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्षही असल्याने सगळ्यांचीच अवस्था ‘सहन होईना आणि सांगताही येईना’ अशी झालेल्याचे चित्र आहे.
काल (बुधवार) प्राधिकरणातील वीर सावरकर सदनमध्ये संघाचे शहरातील काही जबाबदार पदाधिकारी व शहर भाजपचे खासदार अमर साबळे, प्राधिकरण अध्यक्ष सदाशिव खाडे, अमित गोरखे तर शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे , आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांच्यात बैठक झाली होती. प्रचार यंत्रणेची आखणी, दिशा, जबाबदारी, यावर या बैठकीत चर्चा झाली. मात्र पक्षाच्या अध्यक्षांना दुखावून काही धाडसी निर्णय कसे घ्यावयाचे ? यावर सगळ्यानींच शांत राहणे पसंत केले.
भाजपचे या शहरातील जुने जाणते कार्यकर्ते अशी ओळख असलेले खाडे हे आता पद मिळाल्यामळे पक्षासाठी कोणाला अंगावर घ्यायला तयार नाही, उमा खापरे या प्रदेश समितीवर असल्याने व सोलापूरची जबाबदारी त्यांच्यावर असल्याने त्यांनीही शहराच्या निर्णय प्रक्रियेतून जबाबदारी झटकली आहे. तर सचिन पटवर्धन यांच्याकडे राज्य लेखा समितीपद असल्याने त्यामुळे त्यांनाही काही अंशी मर्यादा आली आहे, ओल्ड इज गोल्डचे प्रणेते राजू दुर्गे यांनी सध्याच्या अस्थिर वातावरणात नेमकी साधलेली चुप्पी तर महेश कुलकर्णी यांची नुसतीच तगमग, यामुळे कार्यकर्ते चिंतामग्न झाले आहेत.
दरम्यान, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे उद्या (शुक्रवारी) शहरात येण्याची शक्यता असून काहीतरी मार्ग निघेल अशी चर्चा सुरू आहेत. तर आरपीआय (आठवले गट) पक्षाची आज मुंबईत बैठक होऊन ‘झाले-गेले विसरून कामाला लागा’ अशी सूचना आज रामदास आठवले यांनी पक्ष कार्यकर्त्यांना दिली. त्यामुळे आरपीआय उद्यापासून शहरात सक्रिय होऊ शकतो, अशी चिन्हे आहेत.