विजय जगताप
मावळचे मतदान अवघ्या २८ दिवसांवर येऊनही भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांनी आपली भूमिका अदयापही स्पष्ट न केल्याने शिवसेनेच्या पोटात आता गोळा आला आहे. शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे यांनी घरी जाऊन त्यांची केलेली मनधरणी पाठोपाठ शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शहरात येऊन केलेली शिष्टाईही जगताप यांनी खुंटीवर टांगल्याने आता या पेचातून मार्ग कसा काढायचा? या विवंचनेने भर उन्हात सेनेला ‘हुडहुडी’ भरली असल्याचे चित्र आहे.
आमदार लक्ष्मण जगताप यांची ही कृती व हा निर्णय त्यांच्या धाडसी, जिद्दी व महत्त्वाकांक्षी स्वभावाची प्रचिती आता शहरालाच नाही तर राज्यालाही करून देणारी ठरली आहे.
शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनाही त्यांनी आपली नाराजी तसेच स्पष्ट भूमिका सांगितल्याने रिकाम्या हाताने त्यांना मुंबईला माघारी परतावे लागले आहे. खासदार राऊत हे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचे दोन्ही हात व मेंदू म्हणून संपूर्ण देशात ओळखले जातात. त्यांचा शब्द हा उद्धव ठाकरे यांचा शब्द असतो असा राजकीय वर्तुळात प्रघात आहे.
खासदार बारणे व आमदार जगताप यांच्यातून २००९ पासून विस्तवही जात नसल्याची स्थिती आहे. मागील तीन महिन्यांपासून मावळ मतदारसंघ हा भाजपला सोडावा अशी मागणी जगताप यांनी केली होती. मात्र हा मतदारसंघ शिवसेनेलाच कायम राहिला. मग श्री. जगताप यांनी ‘उमेदवार बदला’ अशी भूमिका घेतली व ती अदयापही कायम ठेवली आहे. खासदार बारणे यांचे राजकीय कर्तृत्वच जगताप यांना मान्य नाही. तसेच बारणे यांनी भाजपविरोधात मागील दोन वर्षात घेतलेला स्टॅन्ड पाहता भाजपच्या नगरसेवकांनीही बारणेंच्या प्रचारात न उतरण्याची भूमिका कायम ठेवली आहे. बारणे यांना आता केवळ जगताप यांचा विरोध न राहता त्याला भाजपचे सामूहिक आंदोलनाचे रूप आले आहे. त्यामुळेच पक्ष कोणताही असो आपली ताकद व बळ जगतापांनी अनेकदा सगळ्यांना दाखवून दिली आहे. शहर भाजपचा हा असहकार आता कसा मिटवायचा? काय निर्णय घ्यायचा? कुणाला मुध्यस्थीसाठी नेमायचे? या विवंचनेत सेना सापडली आहे.
दरम्यान पालघरची जागा असो की जागावाटपाचा फॉर्म्युला असो शिवसेनेने मागचे सगळे उट्टे वसूल करत भाजपला राज्यात पार गुडघे टेकावे लावले असताना इकडे पिंपरी चिंचवडमध्ये मात्र सेनेला भाजपपुढे गुडघे टेकायची वेळ आली आहे. लक्ष्मण जगताप यांना जवळून ओळखणारे सांगतात की, ते आपल्या भूमिकेपासून मागे हटणे मूळात त्यांच्या रक्तातच नाही. त्यांनी स्वत:ला आता इतक्या उंचीवर नेऊन ठेवले आहे की, ते माघारीही फिरू शकत नाही आणि उडीही मारू शकत नाही. इंग्रजीत एक फार चांगले वाक्य आहे, Some people are of kind that they never retreat and never surrender or accept their mistakes.
राजकारणाची आवड असणाऱ्यांना व राजकारणात आपले स्थान निर्माण करू इच्छिणाऱ्यांसाठी पिंपरी चिंचवडमध्ये सध्या सुरू असलेला हा एकाच विचारधारेच्या दोन पक्षातील नेत्यांमधील राजकीय संघर्ष अभ्यास करणारा विषय ठरला आहे. निवडणूक रिंगणात नसतानाही मावळमध्ये सर्वाधिक फोकस व चर्चा आपल्याकडे वळविण्याची किमया आत तरी लक्ष्मण जगताप यांनी साधली आहे. त्यामुळे सध्याच्या घडामोडी पाहता व शिवसेनेची दमछाक उडविणारी जगताप यांची कृती Ultimate Warrior सारखी दिसत आहे.