मागणी केल्याप्रमाणे अजितदादांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांबरोबर काल चिंचवड येथील ॲटो क्लस्टरमध्ये बैठक घेतली. अपेक्षेप्रमाणे ज्या काँगेसजनांनी हॉटेल ब्लू वॉटर येथे दादांना बोलाविले होते त्या मंडळींनी या बैठकीला दांडी मारली.
शहर काँग्रेसच्या दोन गटांनी दादांचा बनविलेला खो खो आता जरी दादांना सहन करावा लागत असला तरी भविष्यात यांच्यात दिलजमाई करण्यात काँग्रेसची नेते मंडळी का थकली असावी याचा उलगडा होत आहे.
शुक्रवारी (दि. २९ मार्च) अजित पवार यांच्या उपस्थितीत ऑटो क्लस्टर, चिंचवड येथे मावळ व भोसरी लोकसभेच्या आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी शहर काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, सर्व सेलचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी अजित पवार म्हणाले की, आता देशात वातावरण बदलले आहे. भाजपाच्या व युतीच्या कारभाराला जनता कंटाळलेली आहे. शेतकऱ्यांना कर्ज माफी दिली नाही. रोजगारात वाढ होण्याएैवजी कमी होत आहेत. शेतकरी आत्महत्या सुरुच आहेत. महागाई रोज वाढत आहे. या सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांना चौकशी भीती दाखविली जाते. समाजात अस्वस्थता आहे. हे सर्व रोखण्यासाठी आता केंद्रात आणि राज्यातही आघाडीचे सरकार आले पाहिजे. ‘मी’ म्हणजेच भारत हि मोदींची प्रतिमा लोकशाहीला घातक आहे. अहिंसेचे तत्वज्ञान सांगणारे मा. गांधी आणि फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांचा वसा घेऊन चालणाऱ्या महाराष्ट्रात अजूनही ‘नथूरामाच्या’ प्रवृत्ती जीवंत आहेत. हे दुर्दैव आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने आता एकजूट समन्वय साधून प्रचाराला लागले पाहिजे. माझी राजकारणातली पहिली निवडणूक मी ‘पंजा’च्या चिन्हावर विजयी झालो असल्याची आठवणही यावेळी अजित पवार यांनी सांगितली.
काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, मावळ व शिरुर लोकसभेच्या आघाडीच्या उमेदवारांना निवडणूक आणण्यासाठी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते दिवस-रात्र प्रचार करतील. प्रचाराच्या नियोजनासाठी शहर पातळीवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची एकत्रित समन्वय समिती स्थापन करण्याची गरज असल्याचे सांगितले.
स्वागत सचिन साठे, सुत्रसंचालन मयूर जयस्वाल आणि आभार विष्णूपंत नेवाळे यांनी मानले.