काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये आघाडी झाली असली तरी सामोपचाराने निर्णय न घेता राष्ट्रवादी काही निर्णय परस्पर घेत असल्याबद्दल पुर्ण जिल्ह्यात प्रचारयंत्रणेत आलेल्या विस्कळीतपणामुळे काँग्रेसने सावध पावित्रा घेत आश्वासन व हमी मिळेपर्यंत तटस्थ राहण्याची भूमिकर स्विकारली आहे.
आघाडी धर्माचे पालन करण्याचे सोडून कुरघोडीचे राजकारण व काँग्रेसला अडचणीत आणणारे प्रयोग राष्ट्रवादी राबवित असल्याबद्दल काल (मंगळवारी) काँग्रेसच्या जिल्हा पातळीवरील बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आश्वासन व हमी देईपर्यंत तटस्थ राहण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. पुणे जिल्ह्यात लोकसभेच्या चारपैकी एक जागा काँग्रेसकडे तर बारामती, शिरूर व मावळ जागा राष्ट्रवादीकडे आजपर्यंत वाटणीला आल्या आहे.
लोकसभेला आघाडीचा धर्म पाळला जातो मात्र विधानसभेला राष्ट्रवादीकडून नेहमी दगाबाजी व उल्लंघन केले जाते. त्यामुळेच २०१४ ला आघाडी होऊ शकली नव्हती. आम्ही त्यांच्या तीन उमेदवारांसाठी रात्रंदिवस काम करायचे आणि आमच्या एका जागेवरील उमेदवारासाठी जिल्ह्यातील बलाढय कार्यकर्ते त्यांनी दुसरीकडे प्रचारासाठी वळवायचे असा सूर पिंपरी चिंचवडमधील पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने यावेळी व्यक्त केला.