प्रतिकूल परिस्थितीत दणकून सराव केला, शरीर कमावलं, पण कुस्ती खेळायला संधी नसल्यावर पैलवानाची जसी तगमग होते सेम त्या अवस्थेतून आज पिंपरी चिंचवड शहर भाजप जात आहे. तर घटक चाचणी परिक्षेत नापास पण वार्षिक परिक्षेत सतत पास होणाऱ्या शिवसेनेच्या मागे प्रचारात भाजपने जायचे तरी कसे? असा प्रश्न पिंपरी चिंचवड शहरात आता निर्माण झाला आहे.
जुन्या जखमा, त्यावर निर्माण झालेल्या खपला इतक्या मोठया प्रमाणात झाल्या आहेत की, सेना-भाजपची युती होऊनही पिंपरी चिंचवडमध्ये मात्र सांधा जुळायला तयार नाही. मागील पाच-दहा वर्षात सेना खासदारांनी (शिवाजीराव आढळराव पाटील व श्रीरंग बारणे) भाजपला कसा आणि किती त्रास दिला याच्या दर्दभऱ्या कहाण्या बैठका घेऊन नगरसेवक मांडू लागल्याने आता आधी जाहीर माफी मग प्रचाराची हमी अशा पावित्र्यात आता शहर भाजप आले आहे. शहर भाजपचे कारभारी असलेल्यांनी नगरसेवकांची ही वेदना समजून घेतली असली तरी मूळ वेदना खरे पाहता त्यांची आहे.
विविध मार्गाने अनेक प्रयत्न करूनही भाजपच्या वाटयाला मावळ व शिरूर मतदारसंघ आले नाही. युतीच्या जागावाटपात नेहमीप्रमाणे या जागा सेनेकडेच राहिल्या. मात्र सेनेचे खासदार असलेल्यांनी किती यातना मागच्या काही वर्षात मित्रपक्षाला दिल्या होत्या त्या व्यक्त करून व्याजासह वसूली करण्याची शक्कल लढवत भाजपने खिंडीतील रस्ता बंद करून आता अचूक टायमिंग साधले आहे.
राजकीय निरीक्षकांच्या म्हणण्यानुसार हायकमांडचा दबाव आला आणि या दोन्ही खासदारांनी झाले गेले विसरून दिलगिरी व्यक्त केली तर एकत्र येण्याला काहीच अडचण नाही. मात्र मनाने व दिलाने हे दोन्ही पक्ष शहरात किती एकमेकांमध्ये मिसळतील हा मोठा यक्ष प्रश्न आहे.
ऊरण, पनवेल, खालापूर, मावळ या चार मतदारसंघापेक्षा पिंपरी आणि चिंचवड हे दोनच मतदारसंघ असे आहेत की जे निर्णायक ठरू शकतात. हे २००९ व २०१४ च्या निकालाने सिद्ध झाले आहे.
या उलट राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या आघाडीत मात्र सावत्रभावांसारखे नाते असूनही त्यांनी आता ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ हा राग आवळला आहे.