सलग वीस वर्षे पिंपरी चिंचवड या शहरावर अधिराज्य गाजविलेल्या व ‘अजितदादा म्हणजे पिंपरी चिंचवड’ असे राज्यात समीकरण बनले गेलेल्या अजितदादांच्या व्यक्तिमत्वात पार्थच्या उमेदवारीच्या निमित्ताने झालेला प्रचंड बदल राष्ट्रवादीसह येथील काँगेसच्या कार्यकर्त्यांनाही अचंबित करून टाकणारा ठरत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री असलेले अजितदादा पवार यांच्या कडक मास्तरकीचा अनुभव मागील वर्षात या शहरातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांसह पालिका प्रशासन व जिल्हा प्रशासनाने जवळून अनुभवला आहे. त्यांची कार्यशैली, समोरच्याशी फटकून बोलण्याची स्टाईल, त्यांची नजर, जरब व हुकूमतचा अनुभव या भागातील जवळपास सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी घेतला आहे.
येत्या लोकसभा निवडणूकीत प्रत्यक्ष दादांचा मुलगाच रिंगणात असल्याने आपल्या तीस वर्षाच्या राजकीय अनुभवाचा कस आता त्यांनी पणाला लावण्यास सुरूवात केली आहे. तर अत्यंत नाजूक कळीचा मुद्दा म्हणजे दस्तरखुद्द ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा नातू ही निवडणूक लढवित असल्याने पवार साहेबांच्या राजकीय प्रतिष्ठेची मावळची ही निवडणूक असणार आहे.
त्यामुळे बारामतीपेक्षा मावळच्या जागेकडे राज्याचेच नव्हे तर देशाचे आता लक्ष लागून राहणार आहे. घराणेशाहीचा होणारा आरोप, पार्थच्या पहिल्या भाषणावरून ट्रोलचा झालेला सामना आणि शून्य राजकीय अनुभव असताना थेट खासदारकीला पार्थ यांनी मारलेली एंट्री हे विरोधकांसाठी महत्त्वाचे मुद्दे ठरणार आहे. मावळ लोकसभेचा निकाल पिंपरी व चिंचवड या दोन विधानसभा मतदारांची टक्केवारी फिरवित असल्याचे मागील २००९ व २०१४ च्या निकालावरून सिद्ध झाले आहे.
त्यामुळे कधी नव्हे ते अजितदादांनी सबूरीचे धोरण स्विकारत कार्यकर्त्यांना स्वत: फोन करणे, त्यांची आस्थेने चौकशी करणे, ताकद असलेल्या नगरसेवकांच्या घरी जाणे, तसेच मित्र पक्ष असलेल्या काँगेसच्या दोनही गटातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणे सुरू केले आहे. या भेटीगाठीत चर्चेत व संवाद कार्यक्रमात सर्वांचे म्हणणे एकाग्रतेने ऐकून घेणे, शहानिशा करणे, एकदम त्वरीत प्रतिक्रिया न देणे हा दादांमधील बदल सर्वांना आश्चर्यचकीत व धक्का देणारा ठरत आहे.
“दरम्यान, अजितदादांनी सुरवातीला शहरात सर्वप्रथम काँग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. यामुळे अस्वस्थ झालेल्या काँग्रेसच्या दुसऱ्या गटाने आपली नाराजी प्रकट केली. ‘कोणाचीच नाराजी नको’ म्हणून परवा दादांनी थेरगांव येथील ब्लू वॉटर हॉटेलमध्ये शहर काँग्रेस नेतृत्वावर नाराज असलेल्या गटाबरोबरही संवाद साधला. नरेंद्र बनसोडे, अशोक मोरे, निगार बारस्कर यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. त्यावर शहराध्यक्ष सचिन साठे यांनी नाराजी व्यक्त करीत, ‘दादा सर्व पदाधिकाऱ्यांना एकत्रित भेटणारच होते मग ही बैठक कशाला घेतली?’ आपली घरातील भांडणे दादांना दाखवून या मंडळींनी स्वत:हून बळंच दादांना भेटण्याची गळ घातल्याबद्दल त्यांनी नाराजीचा सूर व्यकत केला.”