महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या कोण कोणाची पोरं पळवतो यास भलतेच महत्त्व आले आहे. पिंपरी चिंचवड शहरातल्या राजकारणातील प्रभावशाली व्यक्तिमत्व असलेल्या आझमभाई पानसरे यांच्या प्रकृतीच्या चौकशीसाठी शरद पवार व अजित पवार आले खरे, मात्र गळाला मासा लागत नसल्याचा अंदाज आल्यानंतर स्वस्थ बसतील ते राष्ट्रवादीचे स्थानिक नगरसेवक व कार्यकर्ते कसले..? त्यांनी अखेर ‘हंडा नही तो सही, चलो पेला तो उठाओ’ असा निर्णय घेत निहाल पानसरे यांना राष्ट्रवादीत आणत शाबासकी मिळविली.
पण विशेष बात म्हणजे, राजकारणातला शून्य अनुभव व ज्ञान नसलेले निहाल पानसरे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने शहर भाजप चिंतेत अथवा धक्का बसून कोमात जाणे तर दूर पण सौम्य झटका मात्र त्यांना जरूर बसला आहे. मितभाषी असलेल्या आझमभाई पानसरे यांनी आपल्या नाराजीचा मेन पिक्चर भाजपला पाठविण्याऐवजी ट्रेलर पुढे पाठवून अप्रत्यक्ष मेसेज यानिमित्ताने दिला आहे.
या साऱ्या घटना-घडामोडी कशा घडल्या, याचा कानोसा बातमी खासच्या टिमने घेतल्यानंतर अनेक गोष्टींचा उलगडा झाला. पंधरा दिवसांपूर्वी चाकणकडे निघालेल्या अजितदादा पवार यांनी भल्या सकाळी पुण्याहून जाताना आझमभाईंच्या घराकडे आपला मोर्चा वळविला. गेल्या काही महिन्यांपासून प्रकृती ठिक नसल्याने पानसरे उपचार घेत असल्याचे वृत्त सगळीकडे पसरले असल्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट होती. त्यापाठोपाठ ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही आझमभाईंच्या घरी येऊन प्रकृतीची खुशाली विचारता विचारता कौटुंबिक किनार सांधण्यात मशहूर असलेल्या पवार साहेबांनी निहालची आवर्जून चौकशी केली तेव्हा निहाल पाचगणी येथे होते.
तोंडावर आलेली लोकसभा निवडणूक, राष्ट्रवादीने दिलेला पार्थ हा नवीन चेहरा व याच मतदारसंघातून २००९ ला आझमभाईंना राष्ट्रवादीने एकदा दिलेली संधी असा नाजूक धागा या भेटीच्या निमित्ताने गुंफला गेला होता. राष्ट्रवादीने नंतर सुमारे एक दशक आझमभाईंना कायमच उपेक्षित ठेवले मग त्यांनी अगोदर काँग्रेसची व नंतर भाजपची गाडी पकडल्याने शहर राष्ट्रवादी अस्वस्थ होतीच. त्यात आता अजितदादा व शरद पवारांनी संवादाचा पूल बांधला असल्याने राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची टिम कामाला लागली. राष्ट्रवादीचे निरीक्षक म्हणून जबाबदारी एकेकाळी पाहिलेले घनश्याम शेलार यांनी तर रविवारी (ता. २१) भाईंच्या बंगल्यावर तळच ठोकला होता. तर राजू मिसाळ, मयूर कलाटे आदींनी ‘आता निहाल पानसरेंना उचलून दादांची शाबासकी मिळवू’ असा विडाच उचलला. अखेर निहाल पानसरे त्यांच्या जाळ्यात अडकले आणि पक्षप्रवेश घडला. भाईंच्या मान्यतेशिवाय हे सारे घडणे अशक्यच होते.
दोन वर्षापूर्वी झालेल्या महापालिका निवडणूकीत हातात भाजपचे तिकीट असूनही निहाल पानसरे यांनी राजकारणात येण्यास रस दाखविला नव्हता. राजकारणाचा भूगोल व इतिहास याविषयी त्यांचे ज्ञान ‘अेबीसीडी’ इतकेच आहे. मात्र राष्ट्रवादीला काही करून तीर मारून शिकार मिळवायचीच होती. एकूणच यानिमित्ताने ‘भाजपला जखम तर झाली पण वेदना नाही’ असेच म्हणावे लागेल.