सकस, जीवनसत्वे न मिळालेलं कुपोषित पोरगं अचानक ऑलिम्पिक स्पर्धेत धावण्यामध्ये पहिलं येतं. आणि आश्चर्य वाटणारा धक्का सगळ्यांना बसतो, असा काहीसा प्रकार फेब्रुवारी २०१७ ला पिंपरी चिंचवड शहरात घडला. तोळामासा जीव असलेल्या या शहरातल्या भाजपचे ‘इन मीन अवघे तीन’ नगरसेवक २०१२ ला निवडून आल्याची पार्श्वभूमी असताना २०१७ ला पाशवी बहुमत मिळवून भाजपने सत्तेचा पाया या शहरात रोवला. या विजयाचे शिल्पकार ठरले आमदार लक्ष्मण जगताप, व त्यांना साथ देणारे भाजपचे सहयोगी आमदार महेश लांडगे.
भाजपच्या या दोन वर्षाच्या राजवटीला या आठवड्यात दोन वर्षे पूर्ण होत आहेत. काय घडलं.. या दोन वर्षात? भाजपची कामगिरी समाधानकारक आहे की नाही? नागरिकांच्या मनात या सत्तेची काय प्रतिमा आहे? या सगळ्या बाबींचा ‘बातमी खास’ च्या टिमने वेध घेतला आहे. आजपासून सुरू होणाऱ्या या रिपोर्ट कार्डचा जमा खर्च आम्ही तीन भागात प्रसिद्ध करीत आहोत.
प्रतिकूल परिस्थितीत रातोरात बदल
भाजपची सत्ता या शहरात कशी येऊ शकली याचा शोध घेतला तर सर्वप्रथम या शहराला लाभलेल्या दोन स्थानिक आमदारांचे वजन व वलय याचा परामर्शही घ्यावा लागेल. काही घटना व घडामोडी इतक्या वेगाने घडल्या की या दोन आमदारांची थोडी जरी चूकीची पाऊले पडली असती अथवा वाऱ्याची दिशा ओळखण्यास ते कमी पडले असते तर सत्तेचा हा मुकूट मिळणे भाजपला अशक्य होते.
मूळात भाजपचा डिएनए पाहिला आणि या शहरातील जुन्या भाजपच्या नेते, कार्यकर्त्यांच्या कार्याचा धांडोळा तपासला तर ‘घरात भांडी चार पण त्यांचा आवाज ४०० डेसीबल इतका येणारा’ असे म्हणावे लागेल.
जनसंघाचे भाजपमध्ये रूपांतर १९८० च्या दशकात झाले तेव्हापासून या शहरात भाजपचे काम करणारे कार्यकर्ते, त्यांचा परिघ, आणि त्यांच्यामध्ये पदवाटपावरून व गट-तटा वरून होणारी भांडणे ही एवढी लुटूपुटीची असायची की ही मंडळी भविष्यात या शहरात भाजपचा झेंडा रोवतील? असे स्वप्नही कोणी पाहू शकत नाही. मामनचंद अग्रवाल, प्रतिभा लोंखंडे, दादा ढवाण, वसंत वाणी, अंकुश लांडगे, भगवान मनसुख यांच्या कार्यकालापर्यंत यांच्यातील वाद जणू पाचवीला पुजल्या सारखे होते. भाजपमध्ये खऱ्या अर्थाने आणला अंकुश लांडगे या स्थानिकाने. या शहराला त्यांचे नेतृत्व लाभले आणि भाजपचा चेहरा बदलण्यास थोडी सुरूवात झाली. दूर्देवाने पुढे त्यांचे अकाली निधन झाले. परंतू भाजप खचण्याऐवजी हळूहळू उभारी घेऊ लागला. या शहरात भाजप जिवंत आहे, याची जाणीव हळूहळू तत्कालीन नेते गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी यांनाही येऊ लागली. त्यानंतर भाजपचा या शहरातील प्रवास सदाशिव खाडे अध्यक्ष होईपर्यंत ‘जैसे थे’ असाच होता.
२०१४ ला देशाचे चित्र बदलले. मोदी लाटेने रातोरात समीकरणे बदलली. लोकसभेला शेकापच्या तिकीटावर उभे असलेल्या लक्ष्मण जगताप यांनाही भाजपला फारसे महत्त्व दयावे अशी तेव्हा तत्कालीन स्थिती नव्हती. २०१४ च्या लोकसभा निकालाने देशपातळीवर माहोल बदलून गेला. सदाशिव खाडे हे सेलिब्रिटी अध्यक्ष सर्वांना भासत होते. आता पुन्हा अवघ्या पाच महिन्यानंतर राज्य विधानसभेच्या निवडणूका होणार होत्या. लोकसभेला पराभूत झालेल्या लक्ष्मण जगताप यांनी समयसूचकता दाखविली आणि भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षामध्ये कधी नव्हे इतकी चैतन्याची लाट पसरली. जगतापांची फायटर प्रतिमा, जिद्दी स्वभाव, करारीपणा त्यांच्या नुसत्या प्रवेशाने शहर भाजपला सुखकर वाटू लागला. अपेक्षेप्रमाणे चिंचवड विधानसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारीही जगतापांना मिळाली. विक्रमी मतांनी निवडून येत ते आमदार झाले. भोसरीतूनही महेशदादा लांडगे हे अपक्ष निवडून आले. राज्यात टेकूशिवाय उभारी न पकडलेल्या भाजपला लांडगे यांचा आधार मिळाला. महेशदादांनीही आपला कल भाजपकडेच असल्याचे निर्देश दिले होते. शहराला आता दोन स्ट्राँग आमदार मिळाले होते. शहर भाजपला तर जग जिंकल्याचे भासत होते. सांजवातीचे दिवे दिवसाही मावळलेले दिसावे असे सदाशिव खाडे यांचे रूप जगतापांसमोर निर्माण झाले होते. आणि तोंडावर आलेल्या महापालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सूत्रे बदलण्यात सुरूवात झाली. एकमुखी ठराव होऊन लक्ष्मण जगताप अध्यक्षपदी विराजमान झाले. तर भाजपशी तळ्यात मळ्यात असणाऱ्या महेश लांडगे यांनीही स्पष्टपणे भाजपला पाठिंबा देत आपले अपक्ष आमदाराचे नाते भाजपशी जाहीर बांधून घेतले. आणि सुरू झाला प्रवास २०१७ मधील महापालिका काबिज करण्याचा…! क्रमश: उद्या वाचा भाग २