——
( विजय जगताप)
या शहराच्या मातीत जन्म घेऊन येथील सर्वोच्च संस्थेवर आपल्या नेतृत्वाची मोहोर उमटवत लोकनेता बनलेल्या आमदार लक्ष्मण जगताप यांचा आज वाढदिवस.. ! वयाची ५८ वर्षे पूर्ण करून एकोणसाठ मध्ये पदार्पण करत असलेल्या या भूमिपुत्र लोकनेत्याचा संघर्षमय प्रवासही तितकाच थक्क करणारा आहे.
३६ वर्षाच्या आपल्या राजकीय आयुष्यात त्यांनी अनुभवलेल्या चढ उतार मालिकेचा विचार करता अनेकदा हातातोंडाशी आलेल्या संधीचं सोनं करताना त्यांना आलेलं अपयश व वेळप्रसंगी घ्यावा लागलेला ब्रेक या राज्यातील ब्रेकींग न्यूज ठरल्या होत्या हे वास्तव आहे.
१९८६ ला वयाच्या २३ व्या वर्षी पिंपरी चिंचवड महापालिकेत सर्वात तरूण नगरसेवक म्हणून त्यांनी पाऊल टाकले.शीघ्रकोपी स्वभाव हे त्यांचे वैशिष्टय असले तरी या स्वभावाची एक बाजू म्हणजे तो त्यांच्या राजकीय यशाचा युएसपी देखील आहे.
स्थायी समिती अध्यक्ष, महापौरपद भूषविल्यानंतर राष्ट्रवादी काॅग्रेसच्या शहर अध्यक्षपदाची सुत्रे त्यांनी २००१ मध्ये स्विकारली. आणि लिडर म्हणून या शहराला त्यांची पहिली ओळख झाली. त्याच दरम्यान राज्यात आण्णा हजारे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या फायली बनविणे व चौकशी सत्र सुरू केले होते.या पार्श्वभूमीवर आचार्य अत्रे नाट्यगृहात आलेल्या आण्णा हजारे यांना रोखून धरणे व त्यांचा कार्यक्रम उधळून लावल्याने ते राज्यभर चमकले.
हे स्पिरीट वेगळेच असल्याची जाणीव अजितदादा पवार यांना त्याचक्षणी झाली. या काळात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत सुरू असलेल्या सुप्त संघर्षातील ठिणगीचा उपयोग पुणे जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आमदारकीच्या एका जागेसाठी लक्ष्मण जगताप यांना अपक्ष उभं करून राष्ट्रवादीने करून घेतला.काॅग्रेसचे उमेदवार चंदूकाका जगताप यांना अडचणीत आणून लक्ष्मण जगताप यांना राष्टवादीने पुश केले. तेवढयावरच अवलंबून न राहता जिल्ह्यातील भाजप, शिवसेनेसह छोट्या मोठया नगरसेवकांसह सर्वांनाच बखोटीला बांधून लक्ष्मण जगताप विधान परिषदेचे आमदार झाले.अजितदादांनी आपल्यावर ठेवलेला विश्वासही लक्ष्मण जगताप यांनी विजयाची माळ गळयात पटकावून सार्थ ठरविला.(पुढे हेच लक्ष्मण जगताप १४ वर्षानंतर आपल्यालाच कात्रजचा घाट दाखवतील याची सुतराम कल्पना अजितदादांना आली नसेल )
बंडखोरी करून संघर्ष करत लढण्याची दुसरी वेळ २००९ ला पुन्हा लक्ष्मण जगतापांवर आली. चिंचवड विधानसभा निवडणूक जिंकून दाखवत आपल्यातील योध्दयाचा परिचय त्यांनी शहराला व राज्याला करून दिला.दोनदा आमदारकी चुटकीसरशी जिंकलेल्या जगतापांची एव्हाना राजकीय महत्तवाकांक्षा प्रचंड वाढली होती.आता लक्ष्य लोकसभा हे ठरवून
२०१४ च्या लोकसभा निवडणूकीत त्यांनी राष्ट्रवादीशी असलेले आपले नाते तोडून थेट पक्षालाच गुंगारा देत शेकाप तर्फे रिंगणात उडी घेतली.हे तसे थेट शरद पवारांनाच आव्हान होते. मोदी लाट नसती तर ते आज खासदारकीची दुसरी टर्म पार करत आज केंद्रात मंत्री असते हे निर्विवाद सत्य आहे.
खासदारकीच्या पराभवानंतर चाणाक्ष भाजप नेत्यांनी हा हिरा आपल्या गळाला लागला पाहिजे हे हेरले.सहा महिन्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणूकीत त्यांचा पक्ष प्रवेश घडवून तिकीट दिले तसेच शहर अध्यक्षपदाच्या नेतृत्वाची जबाबदारीही दिली. शहरात चिमूटभर अस्तित्व असलेल्या भाजपला २०१७ च्या महापालिका निवडणूकीत त्यांनी सत्तेवर आणून इतिहास घडविला. हा विजय वाटतो तितका साधा नव्हता .अजितदादा पवार यांना पिंपरीतून संपवणारे लक्ष्मण जगताप यांना पाहण्यास व त्यांच्याबरोबर फोटो काढण्यास राज्यभरातील आमदार विधीमंडळात व मंत्रालयात तेव्हा गर्दी करायचे हे वास्तव आहे. फडणवीस मुख्यमंत्री असताना २०१९ मध्ये विधानसभा संपायला ६ महिने बाकी असताना मिळणारे राज्यमंत्रीपद नाकारून त्यांनी फुलफेज मंत्रीपदच घेण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांना सांगितला.मग ही माळ बाळा भेगडे यांच्या गळयात पडली. पुन्हा भाजप सत्तेवर आल्यानंतर मंत्रीपद स्विकारण्याचा हा निर्णय तसा योग्यच होता. दरम्यान मे २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत पुन्हा खासदारकी लढविण्यासाठी त्यांना शड्डू ठोकले खरे मात्र युतीच्या जागा वाटपात सेनेला मावळची जागा गेल्याने त्यांना आपल्या स्वप्नास आवर घालावा लागला.मात्र संजय राऊतांसह भाजप सेनेच्या सगळया नेत्यांना त्यांना शांत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले .लक्ष्मण जगताप ही ताकद महाराष्ट्राने तेव्हा परत एकदा अनुभवली.
पुढे आॅक्टोबर २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत चौथ्यांदा ते आमदार झाले खरे पण महाविकास आघाडीचा जन्म झाल्याने त्यांचे मंत्रीपदाचे स्वप्न पुन्हा हुकले.राजकारणात कधीही काहीही घडू शकते याचा प्रत्यय त्यांना आला.
अजितदादांना आव्हान देऊन शहरात त्यांनी सत्ता आणली होती खरी मात्र तेच अजितदादा आता राज्यात सत्तेवर आल्याने हातात असलेली महापालिका पुन्हा ताब्यात ठेवण्यासाठी अजितदादांबरोबर आता त्यांना लढावे लागणार आहे. राज्यात भाजप सत्तेवर नसल्याने ही लढाई वाटती तितकी सोपी नक्की नाही.
मात्र फायटर प्रतिमा असलेल्या जगतापांना हे आव्हान वाटत नाही ही देखील एक वस्तुस्थिती आहे. आज सकाळी साडेसहा पासून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी लागलेली रांग हिच त्याची साक्ष आहे.