———
(विजय जगताप)
जगविख्यात पार्श्वगायिका,भारतरत्न लता मंगेशकर यांची मुलाखत एकवीस वर्षापूर्वी घेण्याचे भाग्य मला लाभले हा माझ्या आयुष्यातील कधीही न विसरता येणारा क्षण म्हणावा लागेल.
जगात भारताची ओळख लता मंगेशकर व आग्र्याचा ताजमहाल या दोन गोष्टींमुळे सांगितली जाते. मला आठवतंय,१३ सप्टेंबर २००१ साली मुंबईतील प्रसिध्द ‘नवाकाळ ‘या दैनिकाच्या रविवारच्या अंकासाठी लतादिदींची मुलाखत घेण्यास मला जयश्री खाडीलकर यांनी सांगितले. लतादीदी पुण्यात सुरू करत असलेल्या दिनानाथ मंगेशकर हाॅस्पिटलच्या उदघाटनाच्या निमित्ताने दीदी प्रेस काॅन्फररन्स घेणार होत्या.मग यापेक्षा चांगली संधी नाही असे ओळखुन मी पत्रकार परिषद अटेंन्ड केली.व दीदींना ‘नवाकाळसाठी मुलाखत हवीय ‘असा निरोप दिला.हाॅस्पिटलच्याच व्हीआयपी कक्षात त्या उदघाटन तयारीचा आढावा घेत होत्या. टाचणी जरी पडली तरी आवाज होईल.. इतक्या सायलेन्स वातावरणात त्यांचं सुचना देण्याचं काम सुरू होतं.शरद पवार, तसेच केंद्रीय गृहमंत्री लालकृष्ण अडवानी, प्रमोद महाजन आदी दिग्गज मंडळी येणार असल्याने केंद्र व राज्य शासनाचे अधिकारी,गुप्तचर पोलीस यंत्रणांचे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांची ये-जा इतकी शांतपणे सुरू होती की आपल्या पावलांच्या आवाजाने दीदींना त्रास व व्यत्यय यायला नको अशी काळजी सर्वजण घेत होते.
तितक्यात डाॅ धनंजय केळकर यांनी मला अक्षरश: कानाजवळ येऊन निरोप दिला की , “दीदींनी आत बोलावले आहे”. हे वाक्य ऐकून मी धन्य धन्य झालो. मी जणू आकाशात विहार करत पावले टाकतो की काय? असा फिल आला होता. वास्तविक ही सारी किमया स्व. निळकंठ खाडीलकर या नावाची होती. अग्रलेखांचा बादशहा अशी ओळख असलेल्या निळकंठ खाडीलकर यांचा व दीदींचा १९५२ पासूनचा स्नेह होता. आणि म्हणून मला मुलाखतीचे दरवाजे ओपन झाले होते.
मी आत गेलो, एका उंची, आलिशान पांढ-या शुभ्र सोफ्यावर दीदी बसल्या होत्या.२६ वय असलेला मी आज जवळपास एक शतक इतिहासावर कोरलेल्या व्यक्तीची मुलाखत घेतोय या कल्पनेनेच मी गारठून गेलो होतो. त्यांनी खुणेनेच मला बसायला सांगितले.त्यांच्या शेजारील सोफ्यावर मी बसलो.” तू अजून पाच मिनिटे थांब” असे शब्द मला पाहून त्यांनी इतक्या सुमधूर आवाजात उच्चारले की मला अंगावर काटा आला.त्यांचे हलक्या आवाजात काही डाॅक्टरमंडळी व वरिष्ठ पोलिसांशी बोलणे सुरू होते. जी..जी..यस…यस…जी…हो..होहो.. इतकंच ही मंडळी दीदींशी ९० अंशाच्या कोनात वाकून बोलत होती.
मी मनातल्या मनात हा प्रश्न आधी घेऊ ?की नंतर घेऊ ?अशी उजळणी करत होतो. द मिरर, वाॅशिंग्टन पोस्ट, न्यूयाॅर्क टाईम्स,द डाॅन, टाईम मॅग्झीन या जगातल्या टाॅपच्या दैनिकांना व मासिकांना मुलाखती दिलेल्या दीदी आज माझ्याशी बोलणार होत्या.
कदाचित मी थोडा गांगरलोय असं त्यांनी ओळखलं असावं बहुधा. मग वातावरण सैल करण्यासाठी दीदींनीच माझे नाव काय? कुठं राहतोस? घरी कोण कोण असतं?असे प्रश्न विचारत जणू त्या माझीच मुलाखत घेऊ लागल्या.आता मला माझं विमान जमिनीवर आल्याची आतून खुण पटली.आणि पुढे तब्बल २२ मिनिटे मी विचारलेल्या परश्नांची दीदींनी उत्तरे दिली.शाॅर्टहॅन्डपेक्षाही सुपर वेगाने मी ते टिपून घेत होतो.स्वरसम्राज्ञी उत्तरे देत आहेत आणि मी ती टिपतो आहे …हि अनुभूती, संवेदना मला जग जिंकल्याचा आनंद देत होती.