———
(विजय जगताप)
संकट कधी,कोणावर व कसे कोसळेल, हे सांगता येत नाही असे म्हणतात.एकाच वर्षात बदनामीचे तीन प्रसंग सत्ताधारी भाजपच्या तीन नगरसेवकांवर गुदरून पक्षाला बॅकफूटवर जाण्याची वेळ आली.विशेष म्हणजे या तीनही घटनांमध्ये तीन त-हेच्या तीन प्रतिक्रिया पक्ष संघटना व नेतृत्वाकडून व्यक्त झाल्या.
स्थायी समितीचे विद्यमान अध्यक्ष असलेल्या नगरसेवकावर लाच प्रकरणी अटक होणे व त्यांना जेलमध्ये काही दिवस पाहुणचार करावा लागणे ही भाजप सत्तेच्या काळजावर पडलेली व इतिहासात नोंद झालेली पहिली जखम ठरली. तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करण्याची वेळ यामुळे शहर भाजपवर आली. घडलेला प्रकार चुकीचाही म्हणता येईना व यामागे राष्ट्रवादीच्या मंडळीचे षड्यंत्र आहे हे पण सांगता येईना, अशा कात्रीत भाजपा सापडली. या घटनेबद्दल मग प्रतिक्रियाच न देणे हा मार्ग भाजपने अनुकरला. परंतू दबक्या आवाजात
“चांगला माणूस यात अडकला” अशी हळहळ व्यक्त करण्याशिवाय भाजप काहीच करू शकला नाही.सत्तारूढ पक्षनेते असलेले एका महोदयांनी तर फार हास्यास्पद विधान केले.”आतापर्यंतच्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सर्वच स्थायी अध्यक्षांची चौकशी व्हावी व सर्वांनी हेच उद्योग केले असे ते
बोलून गेले”.कोणीतरी मग त्यांना ‘आपलेच नेते असलेले दोन आमदार स्थायी अध्यक्ष होऊन’ गेल्याचे त्यांना सांगताच त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला.
दुसरी घटना भाजपच्या एका नगरसेविकेने शाई फेक आंदोलन केल्यानंतर आयुक्त राजेश पाटील यांनी पोलिस तक्रार दाखल केल्यानंतर त्याचे रूपांतर अखेर त्यांची अटक होण्यात झाले. शहर भाजपने तर या प्रकरणी,’आपण त्या गावचेच नाही व आपला जणू या नगरसेविकेशी संबंधच नाही ‘अशी भूमिका घेतली.या घटनेत राष्ट्रवादीपेक्षा भाजपच्याच काही मंडळींना जास्त आनंद झाल्याचे पहावयास मिळाले. वास्तविक या प्रसंगामुळे शहाणे होऊन ‘आज नगरसेवकांना अटक केली ,उदया प्रशासन आपल्या डोक्यावर मि-या वाटायला देखील कमी करणार नाही’ असा स्टॅन्ड सगळयाच्या सगळया १२८ नगरसेवकांनी घ्यायला हवा होता. ‘त्या नगरसेविका चूक की बरोबर हा मुद्दा नंतर घेऊ पण प्रशासनाचे फारच अती होत आहे ‘असे म्हणणारा एक तरी नगरसेवक पुढे यायला हवा होता. परंतू संघभावना व टिमचे दर्शन या घटनेत काही घडले नाही.
तिसरी घटना परवाच घडली. भाजपच्या एका नगरसेवकाला खंडणी प्रकरणी अटक झाली.ज्या रात्री अटक झाली त्या रात्रीच आख्खं शहर हादरून जाईल इतकं आकांडतांडव भाजपने करणे अपेक्षित होतं.दुस-या दिवशी भाजपने पालिकेत तसेच पिंपरी पोलिस स्टेशनसमोर येऊन ‘दूध का दूध पानी का पानी’ हे सांगण्याचा व दाखविण्याचा जरूर प्रयत्न केला. परंतू एक म्हण आहे तसं झालं, “ बूॅंद से जो गयी वो हौदसे वापस नही आती” भाजपची जी बदनामी व्हायची ती झालीच. शनीचा फेरा मागील दोन वर्षापासून तसा भाजपला सतावत आहेच, शिवाय पक्षाचीच आयमाय काढणारे पक्षाचेच नगरसेवक मागील चार वर्षापासून बोकांडी बसलेले आहेत ही गोष्ट वेगळीच.
भाजप बदनाम होऊनही त्यांचे नशीब पण अजून इतके बलवत्तर म्हणावे लागेल की ,राष्टवादीला त्याचे भांडवल व मार्केटींग कसं करावं, याचाच सूर अजून सापडलेला नाही.