————
(विजय जगताप)
पुणे जिल्हा म्हणजे शरद पवार साहेबांचे होमपीच…! लोकसभा असो की विधानसभा कोणाला निवडून आणायचे व कोणाला कात्रजचा घाट दाखवायचा यामध्ये साहेब तसे वस्तादच..!
१९९५ सालच्या विधानसभा निवडणूकीत भौगोलिकदृष्ट्या प्रचंड मोठया असलेल्या हवेलीतून काँग्रेसचे तिकीट प्रा. रामकृष्ण मोरे यांना मिळाले आणि पवार समर्थकांच्या कपाळावर आठया पडल्या.मी नुकतंच सामना दैनिकातून पत्रकारिता क्षेत्रात पाऊल टाकलं होतं.राजकारण व राजकारणी मंडळींचा शून्य अनुभव माझ्याकडे होता. पण नजरेने जे काय होतंय ते टिपण्याचं माझं काम मात्र चालायचं. पवार साहेबांसमोर ,..होयबा.. आणि गुबूगुबू मान हलवणा-यांपैकी मोरे नसल्याने मग मोरेंना पाडण्याच्या एककलमी कार्यक्रमाचा कट काॅग्रेसमध्येच शिजू लागला.
तर दुसरीकडे युतीच्या जागा वाटपात शिवसेनेकडे हवेली आल्याने गजानन बाबर की बाबा धुमाळ या दोहोंपैकी कोणाला तिकीट द्यायचे यावर सेनेत निर्णय होत नव्हता.अखेर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत तिस-यांदा नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या बाबरांच्या गळयात तिकिटाची माळ पडली. “ बाबर कुणाला काय देत नाय, अन् कुणाचं काय घेत नाही, धुमाळ आला तर त्याच्याबरोबर नाही तर त्याच्या शिवाय’ असं म्हणत बाबरांनी प्रचाराला सुरूवात केली.अपेक्षेनुसार ज्ञानेश्वर लांडगे यांची बंडखोरी झालेली असल्याने रामकृष्ण मोरे यांचा थेट ‘कार्यक्रम’ करण्याचा विडा काॅग्रेसमधीलच मोरे विरोधकांनी उचलला होता. आणि व्हायचा तोच परिणाम झाला.मते विभागली गेली आणि गजानन बाबर निवडून आले .मात्र विजयाचा भगवा गुलाल उधळण्यापूर्वीच ..अरे रे.. मोरे सर पडायला नको होते’ अशी खुलेआम प्रतिक्रिया बाबरांनी व्यक्त केली. विरोधक उमेदवाराबद्दलही आत्मीयता व प्रेम असल्याचे ते मला दिसलेलं पारदर्शक उदाहरण होते.शिवाजीनगर येथील धान्य गोदामात मतमोजणीच्या ठिकाणीच पत्रकारांसमोरच हे वाक्य उच्चारल्याने उदया त्याची हेडलाईन होणारच होती. तर इकडे आपला पराभव झाल्याचे समजताच आपला पी.ए. हरी चिकणे यास सोबत घेऊन रामकृष्ण मोरे यांनी तात्काळ मतमोजणी केंद्र गाठून बाबरांच्या गळयात पहिला हार टाकला. एकमेकांचे विरोधक असूनही आनंद व अश्रुंचा तेव्हा मिलाफ झालेला पहायला मिळायला.
दुस-या दिवशी सगळया पेपरमध्ये या बातम्या झळकल्या.
बाबरांमधील साधेपणा, सहजपणा सर्वांना भावला.या निवडणूकीत युतीची सत्ता राज्यात येऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला होता.बाबर सत्ताधारी आमदार बनले होते खरे पण पिंपरी चिंचवड या बाबरांच्या कर्मभूमीत मात्र काॅग्रेसची सत्ता व ताकद होती. महापालिकेत मोरेंना काॅर्नर करत शरद पवार म्हणतील ती दिशा स्पष्ट होऊ लागली होती.
साधारण वर्षभरानंतर एकदा संत तुकाराम नगर येथे स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळयाचे उदघाटन करायला शरद पवार आले.कार्यक्रम सुरू होऊन शरद पवार भाषण करत होते तितक्यात आमदार गजानन बाबर यांचे आगमन झाले. आपण ‘कोणीतरी खास आहोत’ असा गर्वाभिमान नसलेले बाबर तडकपणे व्यासपीठाच्या खाली पत्रकार जिथे बसले होते त्या लाईनीत येऊन बसले. पवारांचे त्यांच्याकडे लक्ष गेले . पालिकेचे कर्मचारी तातडीने आमदार बाबरांकडे जाऊन “ स्टेजवर बसा.” अशी विनवणी करायला गेले परंतू ‘मला इथेच बसू दया ‘असा हट्ट बाबर धरू लागले. अखेर पवारांनी खुणेनेच आझमभाईंना इशारा केला व एकदाचे बाबर स्टेजवर अवतरले.हल्लीच्या फुटकळ कार्यकरत्यांना स्टेजवर जाण्याचं जे आकर्षण असतं ते आमदार होऊनही बाबरांमध्ये नव्हतं .बाबरांचा हाच गुण पवारांना इतका भावला की , त्या क्षणापासून त्यांचा सेनेतील आवडता आमदार गजानन बाबर ठरले.
एकदा एका कार्यक्रमात माझी व त्यांची ओळख कोणीतरी करून दिली. मी सामनाचा प्रतिनिधी असल्याचे कळताच, अवघं एकवीस वय असलेल्या मला थेट दोन्ही हात जोडत “ या बाबरांकडे लक्ष असू दया”असं दात चावत वाक्यावर जोर देण्याच्या त्यांच्या स्टाईल व अंदाजात ते बोलले.
थोडक्यात आपल्या पक्षाचा हा पत्रकार आहे असा त्यांचा रोख होता.
साधं राहणं, साधं वागणं आणि सर्वसामान्य असलेल्या साध्या कष्टकरी लोकांची कामे करणारा हा माणूस १९९९ ला दुस-यांदा आमदार होऊनही जमिनीवरच राहिला.
त्यांच्या साधेपणाच्या व सहजपणाच्या असंख्य आठवणी व किस्से माझ्या पोतडीत जमा आहेत. गोविंद घोळवे या माझ्या पत्रकार मित्राची व त्यांची खास गट्टी होती.गोविंद कधीही कुठेही असला व आमच्या पत्रकार मित्रांचा थवा जमला की बाबरांना फोन लावे त्या दोघांच्या चेष्टामस्करीतील बोलण्याच्या शैलीचा आम्ही मनमुराद आनंद लुटायचो. एकदा तर आमदार बाबर पालिकेत पत्रकार कक्षात भेळ घेऊन आले व आमच्याबरोबर खाऊ लागले. बोलता बोलता बातम्या सहजपणे ते देऊन जायचे.
खासदार झाल्यानंतरची त्यांची एक सुंदर आठवण आहे. माझ्या एका मित्राने निगडीतील कलादालनात एक प्रदर्शन भरविले होते.उदघाटन आज दुपारी तरी त्याला प्रमुख पाहुणा मिळाला नव्हता. सकाळी साडेनऊ वाजता मला त्याने गाठले. कोण मिळेल का प्रमुख पाहुणा बघ, तुझी ओळख आहे तर बाबर साहेबांना विचार?
मी थोड्या नाखुशीनेच बाबर साहेबांना फोन लावला. “ काय..रे ..जगाला ताप..बोल…कोण पाहुणा भेटला नाही म्हणून मला बोलवतो काय? असा सवाल त्यांनी करताच माझी बोबडी वळाली.अखेर उदघाटनाला ते आले . मित्र तर धन्य धन्य झाला होता.”बाबर साधा आहे ,लोकं जोडलीत म्हणून मला यश लाभतंय, त्यांच्या पक्षात बंडखोरी होते म्हणून बाबर निवडून येतो हा तुम्हा पत्रकारांचा जो समज आहे तो काढून टाका..” निगडीतील सावली हाॅटेलमध्ये चहा पिता पिता ते बोलत होते.
१९७७ पासून अपयश न पाहिलेल्या बाबरांना २०१४ मध्ये खासदार असूनही दुस-यांदा अचानक सेनेने उमेदवारी दिली नाही. ते खचले, व्यथित झाले. राजकारणापासून काही काळ अलिप्त राहिले.मात्र सातारामधील साखर कारखाना , तसेच वाईमध्ये स्वत:चे नेतृत्व निर्माण केले. मात्र पिंपरी चिंचवडशी त्यांचे असलेले नाते व ऋणानुबंध शेवटपर्यंत कायम राहिले.अलिकडेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी त्यांना पुन्हा सन्मानाने कवेत घेतले खरे मात्र मधल्या काळात पडलेली खोच कायम राहिली होती. सत्तेत असो की नसो मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत सामान्य माणसे त्यांच्याकडे येतच होती आणि हिच बाबरांनी मिळवलेली संपत्ती होती.