(विजय जगताप)
आता घरीच बसावं लागतंय म्हणून चरफड करणाऱ्या पोरापोरींनो, जरा आपल्या आया-आजींचे जीवन निरखून बघा,? यांचं सारं आयुष्यच होम क्वारंटाईन करण्यात म्हणजेच कुटूंबाची व घरादाराची काळजी घेण्यात गेलंय..!
१२ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रातील ६५ टक्के नागरिक आजही खेडयातच जीवन जगत असल्याचे चित्र आहे.
शेती हाच जगण्याचा मुख्य आधार राहिलेल्या ग्रामीण जीवनाचे वास्तव जीवन पाहिले तर सारे आयुष्य घराच्या चौकटीच्या आत काढावं लागणा-या बायांना हल्लीच्या पोरांचं ‘घरात बसून गुदमरतंय’ अशी वाक्ये ऐकून आश्चर्य वाटत असल्याची स्थिती आहे.कोरोना या साथीच्या आलेल्या महाभयंकर संकटाने आपला फास भारताच्या दिशेने वळवला असताना खबरदारी म्हणून शहरंच्या शहरं लॉक डाऊन करण्याचा निर्णय शासनाने योग्य निर्णय घेतला आहे. सक्तीने सारे घरी बसून राहिले व उभा देशच्या देश व शहरे लॉक डाऊन केली तरच या मृत्यूचक्रातून भारत वाचू शकतो हे सिध्द झालंय..!
मात्र तरूणांचा देश अशी ओळख असलेल्या तिशीच्या आतील पोरापोरींना घरात बसून राहणं म्हणजे जुलूम वाटू लागला असल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. नाईलाजास्तव का होईना या मंडळींनी शासन आदेशाचे उल्लंघन करायचं नाही असं ठरवलं असलं तरी त्यांची होणारी उलाघाल स्पष्टपणे जाणवत असल्याचे चित्र आहे.
तर हाऊसवाईफ म्हणून आख्खं आयुष्य काढत असलेली आपल्या आया-बाया, आजी, काकू यांचे जीवन बघितले तर होम क्वारंटाईन तर त्या जन्मापासूनच स्विकारत आल्या असल्याची स्थिती आहे.