( विजय जगताप)
शंकर जगताप यांची नियुक्ती भाजपचे धोरण तसेच तत्त्वात बसत नाही, असा पक्षालाच आहेर देण्याचा प्रकार घडल्याने हे प्रकरण संयमाने हाताळण्याचा निर्णय भाजपच्या प्रदेश पातळीवर घेण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड शहर जिल्हा भाजपच्या अध्यक्षपदी शंकर जगताप यांची नियुक्ती होताच या निवडीस ज्येष्ठ नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्याकडून आव्हान देण्यात आले. दरम्यान, भाजप पक्षश्रेष्ठींनी या प्रकाराची नोंद घेतली असून या पक्षांतर्गत बाबीकडे दुर्लक्ष करायचं की समजुतीने हे प्रकरण हाताळायचं याचा निर्णय अधिवेशन संपल्यानंतर घेतला जाणार आहे. भाजपच्या राज्यातील एका सर्वोच्च नेत्याने “बातमी खास”शी बोलताना रविवारी याविषयी भाष्य केले. १९ जुलै रोजी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा भाजपच्या अध्यक्षपदी शंकर जगताप यांची नियुक्ती जाहीर होताच मावळते संघटन सरचिटणीस अमोल थोरात तसेच माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी प्रसिद्ध पत्र काढून त्यास विरोध दर्शवला. वास्तविक भाजप पक्ष संघटनेत २०१४ नंतर तर पक्षाच्या संघटना पातळीवरील निर्णयाला आव्हान, धुसफूस, नाराजी व्यक्त करण्याचे धाडस केले जात नाही.केवळ ‘पुण्याई’ वगळता फारसे दखलपात्र थोरात ठरले नाही, मात्र ज्येष्ठ नगरसेवक असणं तसेच अभ्यासू व कार्यक्षम अशी प्रतिमा असलेल्या शत्रुघ्न काटे यांचा विरोध अधिक प्रकर्षाने नोंद घेणारा ठरला.
शहर भाजपचा इतिहास पाहिला तर पक्षांतर्गत वाद, भांडणे व गटबाजी कायम चर्चेत राहिलेली आहे. पिंपरी चिंचवड हे शहर म्हणून पटलावर आल्यापासून येथे कायम प्रारंभी काँग्रेस व नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा करिष्मा व प्रभाव राहिला. २०१४ नंतर मात्र देशात व राज्यात भाजपचा अंमल सुरू झाल्यानंतर “राष्ट्रवादीचा बालेकिल्ला” अशी या शहराची ओळख पुसण्याचं काम दिवंगत लक्ष्मण जगताप यांनी भाजपच्या तिकिटावर विधानसभेवर निवडून येत सर्वप्रथम केले.भाजपच्या दृष्टीने ही मोठी जमेची व शहरात बसायला बुड मिळणारी बाब ठरली. २०१४ ला अपक्ष आमदार निवडून आलेले शहरातील महेश लांडगे यांनीही भाजपला साथ दिल्याने भाजपच्या शहरातील अस्तित्वाला धार आली. दोन्ही आमदारांना मानणारे गाववाले व बाहेरच्या कार्यकर्त्यांनी भाजपाविषयी प्रेम म्हणून नाही तर आपला नेता जिकडे तर तिकडे आपली दिशा वळवली. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत आजवरच्या आपल्या राजकीय अनुभव व कौशल्यातून दोन्ही आमदारांनी आपल्या शिलेदारांच्या साथीने पालिकेत सत्ता आणली. या शिलेदारांमधील एक म्हणजे आत्ताचे नाराज असलेले शत्रुघ्न काटे.
राजकारणात येण्यापूर्वीपासूनच उद्योग-व्यवसायात शिखरावर असलेले व कार्पोरेट संस्कृतीमध्ये वावरत असलेल्या काटे यांनी समाजकारणासाठी जरी राजकारणाची निवड केली असली तरी त्यांनी शिखरावर जाण्याची मनीषा कधीच लपून ठेवली नाही. महापालिका स्तरावरील सर्वोच्च पदे म्हटल्या जाणाऱ्या स्थायी समिती अध्यक्ष व महापौर या पदांना संधी असताना व पात्र ठरूनही त्यांना भाजप सत्तेच्या पाच वर्षात अक्षरशः दाबण्यात आले. त्यांचं हाय प्रोफाईल व्यक्तिमत्व असणं व जबर महत्वाकांक्षा या दोन गोष्टी त्यासाठी अडथळा ठरल्या. भाजपने पाच वर्षात महापौर व स्थायी समिती अध्यक्षपदी ज्यांना ज्यांना संधी दिली ते एक तर आठवावे तरी लागतात किंवा त्यांचे नावही काढायला नको अशी स्थिती आहे. शंकर जगताप हे एकदाच नगरसेवक होऊन गेले असले तरी आपले बंधू दिवंगत लक्ष्मण भाऊंची सावली म्हणून कालपर्यंत त्यांनी काम केले होते. पडदया मागचे सूत्रधार (अर्थात अजित दोवाल )अशाच भूमिकेत ते सदैव राहिले. भाऊंच्या निधनानंतर त्यांनाच आमदारकी दिली जाणार होती मात्र चिंचवड मतदार संघातल्या स्थानिक नगरसेवकांनी केलेला छुपा विरोध त्यामुळे सहानुभूती म्हणून अश्विनीताईंचे नाव पटलावर आले व राहुल कलाटे यांच्या कृपेने त्या आमदार झाल्या. शहराच्या निम्म्या भागाची वेसण लक्ष्मण भाऊ यांच्यानंतर सुटू नये, म्हणून व भाजपच्या प्रतिकूल काळात साथ दिलेले कुटुंबीय म्हणून शहर जिल्हाध्यक्षपदी शंकर जगताप यांचे नियुक्ती झाली. खरं तर भाजपने उपकाराची परतफेड (ऋणातून उतराई) म्हणून जगताप यांच्या नियुक्तीकडे पाहता येईल. शंकर जगताप यांच्या विषयी सुप्त नाराजी चिंचवड मतदार संघातील मोजक्या काही नगरसेवकांची जरूर आहे. परंतु भाजप पक्ष संघटनेत अशा नाराजीला भीक घातली जात नाही. संघ वर्तुळाचे चालू असलेले काम व आदेश या दोनच गोष्टी या पक्षात चालतात. वास्तविक काटे यांनी आव्हान देऊन मोठं धाडस केलं आहे. परंतू भाजपचा इतिहास पाहिला तर आडवाणी असो की पंकजा मुंडे यांना न बोलता त्यांची जागा दाखविण्याचं काम भाजप पक्ष संघटना करीत आली आहे. एवढं असूनही काटे व त्यांच्या चमूकडे दुर्लक्ष मात्र केले जाणार नाही. त्यांची समजूत तरी घातली जाईल किंवा हमखास एखादा शब्द तरी दिला जाईल. परंतू शंकर जगताप यांची नियुक्ती प्रत्यक्ष इंद्रदेव जरी खाली आले तरी रद्द होणार नाही, हे वास्तव आहे.
जगताप यांना मिळालेली संधी ही चिंचवडचे पुढचे आमदार म्हणूनही भविष्यात असू शकते किंवा मध्येच काही उलथापालथी झाल्या तर मावळचे खासदार म्हणूनही त्यांना संधी दिली जाऊ शकते. जगताप यांना मिळालेली संधी व आवाका प्रचंड मोठा आहे. त्यांच्यात काही उणीवा व दोष जरूर आहेत.पूर्वी भाजपच्या राजकारणात नेतृत्व कसंही लादलं तरी खपून जायचं आता मात्र वक्तृत्व, नेतृत्व याबरोबरच कर्तृत्व जर दाखवलं नाही तर नव्या पिढीतील मतदार गुपचूप हिशोब ठेवत असतो हे अलीकडच्या अनेक उदाहरणांतून दिसून आलं आहे.