(विजय जगताप)
देशात व राज्यात बलाढ्य ताकद असलेल्या भाजपाला एकाच वेळी पत्रकार, आंबेडकरी समाज तसेच ओबीसींसह संपूर्ण बहुजन समाजाला अंगावर घेणे आता परवडणार नाही अशी खात्री झाल्यानेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शाईफेक प्रकरणी माफीनामा सादर करून पेटलेले वादळ अखेर शांत केले आहे.
एकजूट आणि संघभावना कशी असते व किती कमाल दाखवू शकते याचे दर्शन पिंपरी चिंचवड मधील शाईफेक घटनेने महाराष्ट्राला या निमित्ताने दाखवून दिले. घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तींनी सार्वजनिक व्यासपीठावर किती संयमाने व अभ्यासपूर्ण माहितीने बोलायचे असते याचा वस्तूपाठ या निमित्ताने सर्वच राजकीय पक्षांना घालून दिला आहे. विशेषतः भाषणांमध्ये महापुरुषांच्या जीवनकार्याचे दाखले देताना टाळ्या घेणारी वाक्ये, पंच व यमक जुळणारे शब्द जर नीट गुंफले नाही तर ते प्रसंगी कसे अंगलट येऊ शकतात व जाहीर माफी मागण्याची कशी पाळी येते हे चंद्रकांत पाटील यांच्या निमित्ताने दिसून आले आहे. मागील दोन दिवसात शाईफेक प्रकरणावरून आता हा उसळलेला उद्रेक कोणते वळण घेणार,असे वाटत असतानाच यावर पडदा टाकण्याचे काम पडदा लावणाऱ्यांनीच कसे केले याचा इत्यंभूत स्पेशल रिपोर्ट ‘बातमी खास’ च्या वतीने पुढील प्रमाणे असा आहे.
शनिवार १० डिसेंबर या दिवशी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास चिंचवड गावातील माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे यांच्या घरी चहा घेऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील बाहेर पडत असतानाच भीमसैनिक मनोज गरबडे या तरुणाने (अभेद्य सुरक्षा कवच असताना देखील) अत्यंत चपळाईने डोळ्याची पापणी देखील लवत नाही इतक्या विद्युत वेगात धाव घेऊन त्यांच्यावर शाई फेकली. आणि काही सेकंदातच मनोज व त्याच्या साथीदारांना पोलिसांनी ताब्यातही घेतले. नेमकी ही सारी घटना स्पष्ट व ठळकपणे व्हिडिओ कॅमेरात कैदही झाली. आणि काही मिनिटातच ही बातमी राज्याच्या कानाकोपऱ्यात सोशल मिडिया द्वारे व टिव्ही चॅनेलवर पोहोचली. महाराष्ट्र राज्यात तिसऱ्या क्रमांकाचे स्थान असलेल्या चंद्रकांत पाटील यांच्यावर आपल्या डोळ्यादेखत झालेल्या शाईफेक घटनेने पोलिसांना कापरे भरले.तर अवघ्या चार मिनिटात तेथे हजर झालेले पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांचीही भंबेरी उडाली. खवळलेले व रागाने लालबुंद झालेले पालकमंत्री चिंचवडचा कार्यक्रम उरकून भोसरीत आले. तेथे मिडियाला प्रतिक्रिया देताना, त्यांचा रूद्रावतार संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. ‘अरे…नाना पटोल्या… ते …रोहित पवारांनी आंबेडकर वाचलेत का ? इतके संतप्त झालेले व तावातावाने बोलणारे पाटील सर्वांना पहायला मिळाले. पत्रकाराला इतका स्पष्ट व्हिडिओ कसा टिपता आला असा मुद्दा मांडत ‘हा पत्रकार अटक नाही झाला तर मी स्वतः चिंचवड पोलीस स्टेशनला उपोषणाला बसणार..’ असे पालकमंत्र्यांनी म्हटले.
यानंतर मात्र पोलिसांचे धाबे दणाणले.तातडीने त्याच रात्री आयबीएन लोकमत या टीव्ही चॅनेलचे पत्रकार गोविंद वाकडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. याच दरम्यान संतप्त झालेल्या भाजप युवा मोर्चाच्या पिंपरी चिंचवड व पुणे येथील कार्यकर्त्यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात येत ‘आरोपींना आमच्या ताब्यात द्या ‘असे म्हणायला सुरुवात केली. तिकडे ठाण्यातील भाजप आमदार राम कदम यांनी, ‘शाईफेक करणाऱ्यांच्या घरात घुसून मारू’ अशी प्रतिक्रिया दिल्याने खवळलेला आंबेडकरी समाज व सर्व पुरोगामी कार्यकर्ते यांनी चिंचवड पोलीस स्टेशनला धडक दिली. एव्हाना पत्रकार वाकडे यांना ताब्यात घेतल्याचे वृत्त रातोरात सगळीकडे पसरले होते . पिंपरी चिंचवडचे झाडून सर्व पत्रकार आपल्या बांधवाच्या बचावासाठी पोलीस स्टेशनला जमा झाले. मराठी पत्रकार परिषद या राज्यातील सर्वोच्च संघटनेच्या पत्रकारांची व मंत्रालयातील पत्रकारांचीही साथ मिळाली. पिंपरी चिंचवड मधील या घटनेची संपूर्ण राज्यात प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली होती. बाबासाहेबांसाठी काहीही करायला तयार असलेल्या राज्यातील लाखो समाज बांधवांनी सोशल मीडियातून एकमेकांना हाक दिली. हा लढा व्यापक होण्यासाठी पुरोगामी व आंबेडकरी विचारांच्या वकिलांच्या फौजा तयार झाल्या. प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी पुढाकार घेऊन त्यास अधिक बळ दिले .
शनिवारी ११ डिसेंबरला पिंपरी चिंचवड मधील आंबेडकरी समाज हजारोंच्या संख्येने पिंपरी मोरवाडी येथील कोर्टासमोर कुठलेही आवाहन न करता गोळा झाला तर जवळपास ३०० जणांनी सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली चिंचवडगाव ते कोर्टापर्यंत मोर्चा काढला. दरम्यान पोलीस यंत्रणेवर प्रचंड ताण आलेला होता. तर इकडे भाजपने संपूर्ण राज्यात निषेध सभा आयोजित करण्याचा सपाटा लावला होता. पत्रकारांचे जथ्थे पोलीस स्टेशन येऊन ‘आमच्या माणसाला का अटक केली ?असा जाब विचारत होते.(आयबीएन लोकमत चॅनेलमुळे या घटनेचा जास्त प्रसार झाला असे पोलिसांचे म्हणणे होते.) नेमके राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे पिंपरी चिंचवड शहरात पक्षाच्या कार्यक्रमाला आले होते. पत्रकार मंडळी त्यांना भेटली. पाठोपाठ आंबेडकरी कार्यकर्तेही पवारांना भेटले. अजित पवार यांनी शाईफेकीचे समर्थन केले नाही मात्र महापुरुषांवर बोलण्याचा सपाटा लावलेल्या भाजपच्या मंडळींवर ते प्रचंड संतापले होते. ३०७,३५३ अशी गंभीर कलमे शाई फेकणाऱ्यांवर लावल्याने व पाच दिवसांची पोलीस कस्टडी मिळाल्याने कार्यकर्ते भडकलेले होते. सायंकाळी पाच वाजता पिंपरीतील आंबेडकर पुतळा मैदानात शहरातील सा-या आंबेडकरी संघटना व पक्षांचे कार्यकर्ते एकत्र झाले होते.खंबीरपणे निर्धाराची मोट सर्वांनी यावेळी बांधली. रविवारच्या त्याच रात्री पावणे अकरा वाजता पोलिसांनी पत्रकार गोविंद वाकडे यांस अखेर सोडले. पत्रकारांनी लगेच जल्लोष व्यक्त केला .दरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या घटनेवर प्रतिक्रिया आली होती. त्यांनी, ‘शब्द चुकला असेल परंतु आशय बरोबर होता ‘असे म्हटले. आधीच महापुरुषांच्या प्रकरणावरून राज्यपाल कोशयारी यांच्यावरील वादळ संपले नसतानाच हे नवे प्रकरण भाजप आता किती पुढे नेणार असे चित्र निर्माण झाले होते .पत्रकारांना अंगावर घेण्याचे टाळल्याने एक पाऊल भाजपने मागे घेत असल्याचे स्पष्ट झाले. तर चंद्रकांत पाटील यांनीही ११ पोलीस व तीन अधिकारी यांचे झालेले निलंबन रद्द करून फार तर त्यांची बदली करावी अशी प्रतिक्रिया दिली.
आता आग विझवण्याकडे भाजपचे एक एक पाऊल पुढे पडत चालले होते. भाजप व शिंदे गट वगळता सर्व राजकीय पक्षांनी एकत्रित आयोजित केलेल्या १३ डिसेंबरच्या पुणे बंद व १७ डिसेंबरचा मुंबईतील महामोर्चा आता अजून जोमाने निघणार असे रिपोर्ट गृहमंत्रालयाला नक्कीच प्राप्त झाले असणार …भाजप व संघामधील जाणकार मंडळी देखील बारीक आवाजात ‘चंद्रकांत दादांचं चुकलंच ‘असे एकमेकांना म्हणू लागले होते.
सोमवार १२ डिसेंबरचा दिवस उजाडला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी, शाईफेकीचे समर्थन न करता ‘भिक’ हा शब्द उच्चारायला नको होता’ अशी प्रतिक्रिया दिली. दरम्यान, पिंपरी चिंचवड मधील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे ,वंचित, आदी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी महापुरुष सन्मान समिती स्थापन करून हे प्रकरण कसे शांत होईल यासाठी पुढाकार घेतला .नेमके मनसे प्रमुख राज ठाकरे सोमवारी पुण्यात होते. सर्वजण लगेच त्यांना जाऊन भेटले. राज्यपालांवर अगोदरच नाखुश असलेल्या राज ठाकरेंनी सर्वांसमोर मग चंद्रकांत पाटील यांना फोन केला.. पाठोपाठ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनाही फोन केले. अखेर सायंकाळी सहा वाजता प्रसिद्धीपत्र काढून चंद्रकांत पाटील यांनी जाहीर माफी मागत कोणावरही कसलाच आक्षेप नसल्याचे स्पष्ट केले.शनिवारी सहा वाजता चिघळलेले हे प्रकरण सोमवारी सहा वाजता ४८ तासात मिटले.