(विजय जगताप)
पिंपरी चिंचवड शहरावर २५ वर्षापूर्वी राज्य करणारा काॅग्रेस पक्ष आता आपल्या माथ्यावरील मळभ दूर करण्यासाठी सज्ज झाला असून निष्ठावंत कार्यकर्त्यांनीच आता पक्षाला संजीवनी देण्यासाठी कंबर कसल्याचे आशादायक चित्र पहावयास मिळत आहे.
राज्यात सत्तेवर असलेली काँग्रेस , त्याद्वारे कार्यकर्त्यांना व नेतेमंडळींना मिळालेली उर्जा आणि बदलत्या राजकारणाचा प्रभाव या गोष्टी त्यास कारणीभूत असल्याचे स्पष्ट होत आहे.
तोंडावर आलेल्या पिंपरी महापालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर अनेक जण पक्षांतर करतील किंवा प्रबळ पक्षांचे तिकीट न मिळालेले काॅग्रेसचा मार्ग तरी निवडतील , असे आशादायक चित्र आहे.
१९८६ ला महापालिकेच्या पहिल्या निवडणूकीपासून तत्कालीन खासदार प्रा. रामकृष्ण मोरे यांनी या शहराच्या नेतृत्वाची धुरा सांभाळण्यास सुरूवात केली.आणि त्यांनी दूरदृष्टीने घेतलेल्या विविध प्रकल्पांच्या विकास कामांचा पाया या शहरात रोवला गेला.१९९९ ला राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर राज्यात हे दोन पक्ष एकत्र सत्तेत राहूनही काॅग्रेसची धग कमी करण्याचा जाणीवपूर्वक षड्यंत्र रचून आखणीस सुरूवात झाली.दूर्दैवाने आजारपणामुळे मोरे सरांचे अकाली निधन झाले आणि या शहरातील काँग्रेस सक्षम नेतृत्वाअभावी पोरकी होत गेली. सुरेश कलमाडी, नंतर हर्षवर्धन पाटील यांनी येथे नेतृत्व ठसविण्याचा प्रयत्न केला खरा परंतू त्यांचे शहरावरील प्रेम पुतणामावशी सारखेच राहिले. क्षीण होत चाललेल्या काॅग्रेसला पुढे मग थेट बाजारभावात उभी करून सौदा करण्यापर्यंत या शहरातील काही स्थानिक नेत्यांनी मजल मारली.
२०१२ च्या महापालिका निवडणूकीत तर हाताच्या बोटावर मोजता येतील इतके नगरसेवक निवडून आले. गट-तट तेव्हाही होतेच परंतू काँग्रेस किमान अस्तित्व तरी राखून होती. राज्यातील तसेच देशातील राजकारणाचा व वलयाचा प्रभाव व अंमल हा स्थानिक पातळीवरही झिरपत राहणे ही तशी नैसर्गिक बाब …!
२०१४ ला देशात व राज्यात मोदी लाट येऊन राजकारण या क्षेत्राचा आयाम व चेहरा बदलला .
भाजप वगळता अन्य सर्व पक्षांची अवस्था तर पालापाचोळ्यासारखी झाली त्यात काँग्रेस तर आयसीयूत दाखल व्हावी अशा स्थितीत पोहोचली.मी मी म्हणणा-या राज्यातील काँग्रेस नेत्यांना आपले बुड राखताना नाकी नऊ आले आणि त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. २०१७ च्या निवडणूकीत तर पिंपरी चिंचवडमध्ये काँग्रेस औषधालाही राहिली नाही.
उभारी घेण्यासाठी अवसान नसतानाही शहर काँग्रेसची धुरा सांभाळणारे सचिन साठे यांनी आंदोलन ,मोर्चा आदी माध्यमातून काँग्रेसने बाळसे धरावे यासाठी अखंड प्रयत्न केले.जवळपास सात वर्ष त्यांनी हा गाडा ओढला.त्या दरम्यान योगायोगाने २०१९ ला राज्यात अनपेक्षितपणे काँग्रेस सत्तेवर आली परंतू शहरातील नेतृत्वाला बळच दिले गेले नाही.
चतकोर सत्ता राज्यात वाटयाला येऊनही पिंपरी चिंचवड काँग्रेस दूर्लक्षित राहिली.इथं पिकतच नाही तर पेरणी करून काय उपयोग? असाही विचार झाला की काय, ते समजायला मार्ग नव्हता.
इशारे देऊन झाले, साकडे घालून झाले,साठेंसह सर्व पदाधिकार-यांनी राजीनामेही दिले परंतू ‘ ठंडा करके खाओ’ हा काँग्रेसचा आवडता गुणधर्म या शहरालाही लागू करण्यात आला.
बिना अध्यक्ष असलेली काँग्रेस तरीही दिड वर्ष शहरात टिकून राहिली ती एकनिष्ठ व खंबीर कार्यकर्त्यांच्या “हे ही दिवस जातील”या आशेवर.
एव्हाना चार महिन्यांपूर्वी काॅग्रेस पक्षाने अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया सुरू केली . सचिन साठे यांना प्रदेशावर काम करण्यासाठी पद दिले गेले तेव्हाच त्यांना पुन्हा संधी नसणार अशी पाल चुकचुकली.शहरात एक मोठी फळी व लाॅबी तयार केलेल्या साठे यांनाही आव्हान देणारे अन्य कार्यकर्ते एव्हाना रेसमध्ये आले.
अखेर माजी नगरसेवक व काँग्रेसप्रणित इंटक संघटनेचे सचिव असलेल्या डाॅ कैलास कदम यांची नियुक्ती काॅग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीसांकडून करण्यात आली.
स्थानिक अर्थात गाववाल्या काॅग्रेस मंडळींना ही नियुक्ती पेलवेना. कदमांना विरोध करून पाहिलाही गेला , अखेर समांतर काँग्रेस चालवत व स्वतंत्र कार्यक्रम घेत दुधात मीठाचा खडा टाकण्याचे काम काही मंडळींनी आता सुरू केले आहे.
पण आनंददायक बाब म्हणजे काँग्रेस नामाचा गजर तरी सुरू आहे हे सुखकारक चित्र म्हणावे लागेल.या शहराचे शिल्पकार असलेल्या दिवंगत प्रा.रामकृष्ण मोरे यांचा आज १७ वा स्मृतीदिन…! शहर काॅग्रेस त्यानिमित्त कार्यक्रम घेत आहे आणि म्हणूनच हे लक्षण म्हणजे काँग्रेस उभारी घेत असल्याचे चिन्ह आहे.