नाव, यश आणि पैसा मिळूनही आपले पाय अजूनही जमिनीवरच आहेत, व समाजाचे आपण सदैव देणं लागतो ‘ही भावना वडगावच्या अतुल वायकर यांनी आपल्या आचरणाने तरूण पिढीला नुकतीच दाखवून दिली.
शेतीबरोबरच धार्मिक व अध्यात्मिक असलेला वायकर कुटूंबियांचा तीन पिढयांचा वारसा, जोडीला राजकीय घराणे म्हणून असलेले वलय आणि गेल्या काही वर्षापासून हाॅटेल व्यावसायीक म्हणून राज्याच्या कानाकोप-यात मिळविलेले नाव….! रावण थाळी, बुलेट थाळी यासाठी प्रसिध्द असलेल्या वडगाव येथील हाॅटेल शिवराजचे ते मालक आहेत.हा आहे अतुल वायकर यांचा परिचय.
नुकताच त्यांचा वाढदिवस त्यांनी एका अनोख्या सामाजिक उपक्रमाद्वारे साजरा केला.
सुमारे शंभर घरे असलेल्या आंदर मावळातील कुसवली गावातील आदिवासी कुटुंबियांना शनिवारी २ आॅक्टोबर रोजी त्यांनी १०० ब्लॅंकेट तसेच पाच ते पंधरा वयोगटातील लहान मुलांना ड्रेस व सगळयांना बिस्किटे व चाॅकलेट असा खाऊ त्यांनी समक्ष येऊन वाटप केला. तसेच येथील सहारा वृद्धाश्रमातील अनाथ व निराधार आजी आजोबांशी हितगुज साधत त्यांच्या आजारपणासाठी व दवागोळयासाठी अकरा हजार रुपयांची देणगी त्यांनी या प्रसंगी दिली.
कुसवली गावच्या सरपंच चंद्रभागा दाते, पत्रकार व प्रा.महादेव वाघमारे, कैलास खांडभोर, सागर आगळमे, रमेश भुरुक, विकास सातकर, निलेश शिंदे, वैभव नवघणे, अमित नवघणे, या आपल्या मित्र परिवाराबरोबर ते आले होते. शिवराज ग्रुपचे सदस्य व आदिवासी बांधव मोठया संख्येने यावेळी उपस्थित होते.
“सामाजिक बांधिलकीतुन समाजातील गरीब व गरजूंना मदतीचा हात देणे हे माझे कर्तव्य आहे. मावळात पावसानंतर कडाक्याची थंडी पडते यावेळी आदिवासी बांधवांची गैरसोय होऊ नये यासाठी वाढदिवसाच्या अनुषंगाने ब्लॅंकेट वाटप व कपडे तसेच खाऊ वाटण्याचा मी निर्णय घेतला असल्याचे अतुल वायकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.
सहारा वृध्दाश्रमाचे संचालक व लेखक विजय जगताप यांनी त्यांचे “ आम्ही घडलो वाचनाने , व रयतेचा राजा” ही स्वत: लिहिलेली दोन पुस्तके देऊन त्यांचा सन्मान केला. तर कुसवली गावाच्या वतीने सरपंच चंद्रभागा दाते व सदस्य सिध्दार्थ भालेराव यांनी श्रीफळ देऊन त्यांचे अभिष्टचिंतन केले.