(विजय जगताप)
भाई, या पालिकेतला नगरसेवकही पाच वर्षात कोटयाधीश होतो आणि तुम्ही तर स्थायी समिती अध्यक्ष म्हणून या पालिकेची चक्क एक वर्ष तिजोरी सांभाळूनही इतके कंगाल कसे? या माझ्या रोखठोक प्रश्नावर भाई खदखदून हसले, ‘ अरे… पैसा हा माणसाला जगणं जसं शिकवतो ना तसंच जगण्यातून उठायलाही लावतो.. माझी अवस्था या दुस-या प्रकारासारखी झाली, बस्स….?
भाई म्हणजेच सुरेश सोनवणे यांचे सहज बोलणं देखील कधी कधी कळत नसायचं ,पण …पैसा, वलय, ग्लॅमर याच्या पलिकडे पोहोचलेल्या या माणसाला या गोष्टीची कधीच खंत नव्हती,की पश्चाताप नव्हता.
पिंपरी चिंचवड महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्षपद भूषविलेले सुरेश भाई सोनवणे यांचे आज निधन झाले.
वाकड येथे राहणारे व गेले तब्बल एक दशक तीन माणसे देखील नीट बसणार नाही ,इतक्या लहान अशा जीर्ण, कळकटलेल्या खोलीत ते राहत.स्वत:ला जणू कैद करून घेतलेल्या अवस्थेत भाई जरी राहात असले तरी त्या कुबट वासाच्या खोलीत पुस्तकांचे ढिग मात्र चहूबाजूंनी असे.
राजकीय वक्ता कसा असला पाहिजे , त्याची भाषणशैली कशी हवी.. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भाई सोनवणे.
पिंपरीतील खराळवाडी या वाॅर्डमधून १९८६ च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणूकीत भाई निवडून आले.अतिशोयक्ती नाही परंतू वसंतदादा पाटील,शरद पवार, रामकृष्ण मोरे हे भाईंच्या भाषणाचे चाहते होते.
एकदाच निवडून आलेल्या भाईंनी पुन्हा मात्र पालिकेची वाट कधी धरली नाही. परंतू काॅग्रेस पक्षाची ती मुलूखमैदानी तोफ असल्याने लोकसभा असो की विधानसभा त्यांची भाषणे प्रचार सभेत धुरळा उडवित.
पुढे पुढे अचानक भाई सार्वजनिक जीवनातून दिसेनासे झाले. दोन वर्षापूर्वी दिवंगत रामकृष्ण मोरे यांच्यावरील पुस्तकाच्या निमित्ताने त्यांचा अक्षरश: मला शोध घ्यावा लागला. पुस्तके, सिगारेट व ती खोली हेच त्यांचं आयुष्य बनलं होतं.
माणूस भूतकाळाच्या आठवणींनी सुखावतो किंवा दुखावतो तरी पण भाईंना वर्तमानकाळच आवडायचा व त्यात ते खुश असल्याचे सांगत.करोडो रूपये पाहिलेला व तितकेच पैसे कमावलेला हा माणूस नंतर ना खचला की ना पस्तावला. त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली..!