विजय जगताप
आज ७ फेब्रुवारी खासदार अमर साबळे यांचा वाढदिवस. त्यांच्या पक्षनिष्ठेविषयी आणि त्यांच्या आयुष्यातील रोचक व रंजक घडामोडीसंदर्भात ‘बातमी खास’ने आपल्यासाठी आणला आहे, खास आठवणींचा कोलाज.
नशीब आणि संधी कोणाच्या आयुष्यात कशा रूपाने कधी झळकेल हे कधी सांगता येत नाही. पक्षसंघटनेत अधिराज्य गाजविलेल्या साबळे यांच्या राजकीय आयुष्याचा आलेख २०१४ साली अचानक गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर शून्यावर आला होता. शेअर बाजारातील निर्देशांकाने जोरात उसळी घ्यावी तसे साबळे यांच्या आयुष्यात चमत्कार घडला आणि रातोरात त्यांना खासदारकी मिळाली. सगळं ऐश्वर्य असूनही खासदार होणं, नेता होणं याचा मोह राजेश खन्ना, अमिताभ बच्चन ते राहुल बजाज, अनिल अंबानी यांनाही आवरता आला नव्हता असा इतिहास आहे. त्या अमर साबळे यांना पाच रूपयाचा चहा देखील कोणाला न पाजताही खासदारकी मिळाली ही ‘शॉकिंग न्यूज’ म्हटली जाते.
भाजप पक्ष संघटनेचा साबळेंना खासदारकी देण्या मागे जातीचे समीकरण साधणे तसेच वेगळा मेसेज देणे असा हेतू असला तरी पक्षनिष्ठेशी बांधिल असलेला कार्यकर्ता हे देखील त्या मागचे एक प्रमुख कारण होते.
मूळचे बारामतीकर असलेले अमर साबळे हे पत्रकार. १९८५ च्या सुमारास साप्ताहिक केकवली हे वृत्तपत्र ते बारामतीतून चालवत. याच बरोबर पुढारी, लोकसत्ता, पुण्यनगरी या दैनिकांचे ते बारामतीचे वार्ताहर म्हणून काम सांभाळत. सत्ताधारी काँग्रेसला अर्थातच शरद पवारांना आपल्या बातम्यांमधून झोडपून काढण्याचा विरोधकांचा व पत्रकारांचा त्यावेळी एककलमी कार्यक्रम असे. शरद पवारांवर आरोपांच्या फैरी करून घायाळ करणारे गोपीनाथ मुंडे तेव्हा महाराष्ट्राच्या राजकरणात टॉपला असलेले नेतृत्व होते. शेटजी-भटजींचा असलेला भाजप पक्ष मुंडेंनी बहुजनांचा करून दाखविला होता. याच काळात बारामतीमध्ये मुंडे व साबळे यांचा परिचय झाला. त्याच्याही अगोदर साबळे हे तसे संघाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून बारामतीच्या पंचक्रोशीत प्रसिद्ध होतेच शिवाय भिकूजी दादा इदाते यांच्याशी त्यांचा असलेला ऋणानुबंध असाधारण स्वरूपाचा होता.
मुंडेंना साबळे यांची वर्कृत्व व लेखनशैली आवडली. कार्यकर्ते हेरण्यात अचूक असलेल्या मुंडेंनी त्यांना मग आपल्या सोबतच घेतले. कालांतराने ते मुंडे घराण्याचे फॅमिली मेंबर बनले. मुंडे सोपवितील ती जबाबदारी पार पाडणे आणि यशस्वी करणे या गुणांमुळे ते मुंडेंच्या गळ्यातील ताईत बनले. १९९० पासून मुंडेंच्या सर्व निवडणूकांचे प्रचार प्रमुख व निवडणूक रणनितीकार म्हणून ते ओळखले जाऊ लागले. संपूर्ण महाराष्ट्रात सभांसाठी मुंडेंचा झंझावात फिरत असे तर इकडे बीड-परळीमध्ये अमर साबळे मुंडेंचा मतदारसंघ सांभाळत असत. ‘अमर जो निर्णय देईल तो माझा निर्णय असेल व त्यानुसार सगळ्यांनी काम करायचे’ अशी ताकीदच गोपीनाथ मुंडे यांनी सगळ्यांना दिली होती. त्या दरम्यान समरसता मंच या संघाच्या प्रमुख फांदयापैकी एक असलेल्या विभागाचे महाराष्ट्र अध्यक्ष तसेच अनुसूचित जाती मोर्चाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अशी फादर बॉडीतील पदे साबळेंना मिळाली. विनोद तावडे, देवेंद्र फडणवीस ही तेव्हा वीस-बावीस वर्षाची पोरं होती. युवा मोर्चाचे कार्यकर्ते अशी त्यांची ओळख असायची. साबळेंचा आदेश व त्यांनी सांगितलेले काम म्हणजे मुंडे साहेबांचा आदेश असल्याने सर्वजण तो ऐकत असत. ‘अरे देवेंद्र… अे विनोद… अशा शब्दात तेव्हा अमर साबळे त्यांच्याशी संवाद साधत. पक्षाच्या विविध संसदीय कमिटयांवर निरीक्षक म्हणूनही पुढे अमर साबळेंना संधी मिळत गेली. उमेदवारांची चाचणी करणे, निरीक्षक म्हणून जाणे यासारख्या जबाबदाऱ्या मिळत गेल्या. २००९ साली संपूर्ण राज्यात विधानसभा मतदारसंघाची पुर्नरचना झाली आणि पिंपरी, चिंचवड व भोसरी हे तीन मतदारसंघ निर्माण झाले. पिंपरी हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. पिंपरीशी काडीमात्र संबंध नसताना तेव्हा धायरी (सिंहगड रोड, पुणे) येथे राहात असलेल्या साबळेंना पिंपरीतून निवडणूक लढविण्यासाठी मुंडेसाहेबांनी आदेश दिले. आणि निवडणूकीच्या दोन महिने अगोदर अमर साबळे या शहरात वास्तव्यास आले. साबळेंना आपण ताकद दिली आहे हे दाखचिण्यासाठी ७ फेब्रुवारी २००९ या दिवशी अमर साबळेंच्या वाढदिवसाला पिंपरी येथे मुंडेसाहेब स्वत: आले. या निवडणूकीत साबळे यांचा पराभव झाला असला तरी त्यांनी ५१ हजार ५३४ इतकी मते घेतली होती हे विशेष. २०१४ ला मात्र गणिते बदलली. भाजप व सेना एकमेकांविरूद्ध लढले. पिंपरी मतदारसंघ भाजपने आरपीआयला सोडला. नाराज झालेले साबळे पक्षाविरूद्ध संताप व्यक्त न करता परळीला पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी निघून गेले. एव्हाना पक्षश्रेष्ठी नाराज साबळेंचे पुनर्वसन करण्यासाठी योग्य संधीची वाट पहात होते. भाजप सत्तेवर आला होता विधानपरिषदेची एक जागा विदर्भात पुढे रिकामी झाली. पक्षापुढे चित्रा वाघ व अमर साबळे हि दोन नावे होती. त्यांना तयारीत राहण्याच्या सुचना दिल्या होत्या. मात्र ऐनवेळी महिलांना प्राधान्य या निकषावर चित्रा वाघ यांना संधी मिळाली. पुढे काही दिवसातच मुरली देवरा या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचे निधन झाले आणि राज्यसभेची एक जागा रिकामी झाली. ही जागा पटकाविण्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी असताना भाजपने उमेदवारी अर्ज भरायच्या आदल्या दिवशी अमर साबळेंना ही जागा देण्याचे ठरविले. दिल्लीहून त्यांना फोन गेले परंतू कामात असल्याने त्यांनी मोबाईल उचलला नाही. शेवटी पाच वाजता रावसाहेब दानवे यांनी फोन केला आणि ‘उदयाच्या उदया फॉर्म भरायचाय, कागदपत्रांची तयारी करा’ असे कळविले. आनंद गोंधळ आणि धावपळ एकाच वेळी सुरू झाली. त्या दिवशी रात्री मुख्यमंत्री फडणवीस, चंद्रकांत पाटील तसेच पंतप्रधान कार्यालयातून फोन आले. दुसऱ्या दिवशी मुंबईत मुख्यमंत्र्यांसमवेत साबळेंनी राज्यसभेचा फॉर्म भरला.
४ मार्च २०१५ ला ते खासदार झाले. महाराष्ट्रातील सर्वत्र राजकीय पक्षांच्या व नेत्यांच्या भुवया उंचावल्या. आपल्या बारामतीचा हा गौरव आहे असे समजून बारामतीकरांनी नंतर शरद पवारांच्या हस्ते त्यांचा भव्य सत्कारही केला. अतिश्य सामान्य, मध्यमवर्गीय कुटुंबातील साबळे यांची ही झेप कौतुकास्पद अशीच आहे. एकेकाळी फुले विकून आपल्या कुटुंबाच्या चरितार्थाला मदत करणारे अमर साबळे आता सोलापूर लोकसभेची निवडणूक लढविण्याच्या तयारीत असल्याचे चर्चेत आहे.
बातमी खास परिवाराच्या वतीने त्यांना ५६व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!