(विजय जगताप)
पिंपरी चिंचवड शहरात होत असलेल्या पत्रकारांच्या राष्ट्रीय अधिवेशनाला न गेल्यास राज्यभर चुकीचा मेसेज जाईल, याची जाणीव झाल्याने अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उशिरा का होईना येथे परवा हजेरी लावली.
राज्यातील सर्वात मोठया व जुन्या पत्रकार संघटनेच्या अधिवेशनाला मुख्यमंत्र्यांनी यावं… पत्रकारांचे प्रश्न व अडचणी समजून घ्याव्यात.. यासाठी मराठी पत्रकार परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी गेल्या दोन महिन्यांपासून प्रयत्न सुरू केले होते. मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी तर पाच वेळा मुख्यमंत्र्यांची यासंदर्भात भेट घेतली होती. प्रत्येक भेटीत ‘नक्की येणार ‘असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला होता खरा परंतु दोन दिवसांवर कार्यक्रम येऊनही पोलीस यंत्रणा व मुख्यमंत्री कार्यालयाकडून काहीच हालचाल होत नसल्याचे दिसल्याने मुख्यमंत्र्यांशिवाय अधिवेशन सुरळीत पार पाडायचं असा निर्णय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने घेण्यात आला. दरम्यान, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भल्या सकाळीच म्हणजे १९ फेब्रुवारीला मुख्यमंत्री कार्यालयाकडून निरोप आला की,” मुख्यमंत्री येणार नाही पण व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित करतील”. परंतु त्यास स्पष्ट नकार संघटनेने दिला. व अधिवेशनास प्रारंभ केला.
आपल्या उद्घाटनपर प्रास्ताविकात परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी, याविषयी जाहीर नाराजी व्यक्त करीत, ‘यापुढे कुठल्याही राजकीय मंडळींना अधिवेशनाला निमंत्रितच करायचे नाही’ अशी भूमिका मांडली. पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या व राज्यभर विस्तार असलेल्या संघटनेच्या या अधिवेशनाला जर राज्यकर्तेच महत्त्व देत नसतील तर आपण आपला वसा आणि वारसा त्यांच्या शिवाय चालवू’ असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, हि नाराजी व उमटलेला सूर सोशल मीडियाद्वारे राज्यभर लाईव्ह होत असल्याने त्याचे पडसाद एव्हाना मंत्रालयापर्यंत धडकले होते. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचे भाषण संपून आता
ज्येष्ठ पत्रकार व खासदार कुमार केतकर यांचे भाषण सुरू असतानाच “मुख्यमंत्री येत आहेत” असा पोलिसांचा निरोप संयोजक पदाधिकारी असलेल्या पिंपरी चिंचवडच्या मंडळींना आला.नेमके याचवेळी केतकरांच्या भाषणात झालेला गोंधळ ,अशातच संयोजक पत्रकारांची आलेल्या निरोपामुळे उडालेली धांदल,भरीस भर म्हणजे अधिवेशनाला आलेल्या राज्यभरातील पत्रकारांच्या गाड्यांमुळे आधीच सर्व परिसर तुडूंब भरलेला असल्याने मुख्यमंत्र्यांच्या वाहनाचा ताफा अधिवेशन स्थळी कसा आत घुसणार ? हा मोठा प्रश्न पोलीस व संयोजकांपुढे अचानक निर्माण झाला. मुख्यमंत्री चाॅपर विमानाने येत असल्याचा निरोप आला खरा मात्र अचानक ठरलेल्या या दौऱ्यामुळे चॉपर किंवा हेलिकॉप्टर कुठे उतरवणार ? यासाठी सुरक्षा यंत्रणेची काहीच तयारी व तपासणी झालेली नसल्याने पोलीस यंत्रणेलाही एव्हाना घाम फुटला होता. अगोदरच काही दुय्यम श्रेणीच्या लेटरहेड पुरत्याच असलेल्या अन्य पत्रकार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी तर मुख्यमंत्र्यांनी येथे येऊ नये म्हणून ‘देव पाण्यात बुडवलेले’…! अशा काटे की टक्कर असलेल्या अवस्थेत पुन्हा अर्ध्या तासाने निरोप आला की,’ मुख्यमंत्री आज न येता उद्या सकाळी ११ वाजता येत आहेत’.अखेर त्या दिवसापुरता सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. दुसऱ्या दिवशी तर सकाळी सातलाच पोलीस यंत्रणेने अधिवेशन स्थळाचा ताबा घेतला होता. अधिवेशनाचा बॅच गळ्यात असल्याशिवाय संयोजक असो की कितीही मोठा पत्रकार कोणालाच पोलिस आत सोडत नव्हते. हे म्हणजे “आपलीच मोरी अन् आंघोळीला चोरी” अशी गत पत्रकारांवर आली होती. काहींचे पोलिसांबरोबर खटकेही उडत होते. तब्बल साडेतीन हजार पत्रकार राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले असल्याने संयोजक असलेल्या पिंपरी चिंचवड पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना तर गेल्या दोन तीन दिवसांपासून श्वास घ्यायला देखील वेळ मिळालेला नव्हता. शहरातील दैनिकांचे नेहमी ‘हवेत’ असलेले पत्रकार (छोटी जिल्हा दैनिके, साप्ताहिके तसेच आताच्या डिजिटल मीडियाला ‘अस्पृश्य’ समजणारे) हे झाडून सर्व जण अधिवेशनाचे वृत्तांकन करायला येथे अवतरले होते. अखेर मुख्यमंत्री आले. आपल्या भाषणात त्यांनी,’समज गैरसमज होतच असतात, परंतू आपण सगळेच एकाच परिवाराचे घटक आहोत, तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना असं आपलं नातं असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं.
जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, विभागीय आयुक्त, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त, खासदार, आमदार सारे जण मुख्यमंत्र्यांच्या पाठोपाठ अधिवेशनाच्या मांडवाखाली न बोलवता आता आले होते. “साहित्य संमेलनाला जसे सरकार निधी देते तसे २५ लाख रुपये या मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनाला महाराष्ट्र सरकार देईल” अशी जाहीर घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. पत्रकारांचा आरोग्याचा प्रश्न, अधिस्वीकृती कार्ड ,पेन्शन योजना यावरही त्वरित बैठक घेऊन मार्ग काढण्याचे आश्वासन त्यांनी दिलं.
अवघ्या एका कार्यक्रमासाठी आलेले मुख्यमंत्री लगेच मुंबईला गेले देखील…!
एकी,संघभावना, संस्थेवर असलेले सर्वांचे प्रेम यामुळे मराठी पत्रकार परिषदेच्या ८३ वर्षाच्या वाटचालीला शासन दरबारी शिक्कामोर्तब आणि अधिष्ठान मुख्यमंत्र्यांच्या येण्यानं आता प्राप्त झालं होतं.