(विजय जगताप)
अवघ्या दोन वर्षावर आलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी मावळमधून खासदारकीची हॅट्रिक मारणे सोपे व्हावे, हेच गणित आखून खासदार श्रीरंग बारणे यांनी शिंदे गटात उडी मारली आहे.
खासदार बारणे यांची ही रणनीती समजा यशस्वी झालीच तर मोठ्या आशेने मावळ लोकसभेकडे डोळे लावून बसलेल्या भाजपला पुन्हा एकदा आपल्या मित्र पक्षाची तिसऱ्यांदा सेवा करावी लागणार आहे. नगरसेवक पदावरून थेट शिवसेनेतर्फे सलग दोनदा खासदार झालेल्या आप्पा बारणे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडण्यामागे आपल्या संभाव्य राजकीय चालीचे खुबीने गणित बसवून घेतले आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशना निमित्त सध्या दिल्लीत असलेल्या खासदार बारणे यांनी आपल्या बदललेल्या भूमिकेविषयीची प्रतिक्रिया दिली नसली तरी, आधीच पाठीचा कणा तुटलेली व संघटना पातळीवर खिळखिळी झालेल्या पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यातील शिवसेनेला बारणे यांच्या भूमिका बदलाने हादरा बसला आहे. बारणे यांनी शिंदे गटाचा हात पकडून एका दगडात तीन पक्षी मारले आहेत. शिंदे सरकार समजा अडीच वर्षे टिकलेच तर २०२४ मध्ये प्रथम लोकसभा निवडणुका व नंतर राज्यातील विधानसभा निवडणुका असणार आहेत. आपल्या समर्थक आमदार, खासदार व साथ दिलेल्या अपक्ष आमदारांसाठी जीवाची बाजी लावण्याची व ते पुन्हा निवडून न आल्यास राजकारणातून संन्यास घेणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच केली आहे.
त्यामुळे आगामी लोकसभेसाठी मावळची जागा बारणेंसाठी सोडण्याची मागणी मुख्यमंत्री शिंदे भाजपकडे करू शकतात. “२०१४ व २०१९ मधील दोन्ही वेळेस भाजपच्या पाठिंब्यामुळेच आपण खासदार झाल्याचे बारणे यांनी यापूर्वीच जाहीर कबूल केले आहे.
बारणे यांना शिंदे गटात जाऊन भाजपची साथ मिळणार असल्याने बारणे यांचे राजकीय शत्रू असलेले आमदार लक्ष्मण जगताप यांच्या खासदार होण्याच्या
स्वप्नांना आपोआपच कात्री लागली गेली आहे. “आपण गट बदललाय पक्ष थोडीच बदललाय” असे सेना कार्यकर्त्यांना दाखवून देत बारणे यांनी एकाच वेळी शिवसैनिकांच्या पाठीत व मानेत बुक्की हाणली आहे.