(विजय जगताप)
महापालिकेतील सत्ताधारी भाजपला शहरातील भटक्या कुत्र्यांची नसबंदी आता चांगलीच भोवणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहे. महापौरांनी या प्रकरणी दिलेले चौकशीचे आदेश आणि नियम व अटींचे उल्लंघन करून पालिकेने नसबंदी कामापोटी चार संस्थांना मिळून दिलेली ७३ लाखांची रक्कम कशी ? व कोणाच्या शिफारशीवर असे म्हणत ‘बाप दाखव नाही तर श्राध्द घाल’अशा पध्दतीची मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपची नाकाबंदी करून टाकली आहे.
एक वर्षापूर्वी स्पर्श हाॅस्पिटल बिल घोटाळा उघडकीस आल्यापासून आज पर्यंत सातत्याने सत्ताधारी भाजप चहुबाजूने अडचणीत व संकटांच्या चक्रव्यूहात सापडत आला आहे. त्यात आता कुत्र्यांच्या नसबंदी प्रकरणाची नवी भर पडली आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील ७ हजार १२५ भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्याचे काम मागील वर्षी कोरोना काळात प्राण्यांविषयी काम करणा-या चार संस्थांनी मिळून केले व त्या कामापोटी चौघांना मिळून ७३ लाखाचे बिल पालिकेने अदा केले.मात्र या संस्थांनी नसबंदी खरंच केली का? याची कोणतीही डिजिटल ( फोटो वा व्हिडीओ) तसेच जैव कचराविषयक पुरावा या संस्थांनी सादर केलेला नाही.वास्तविक नसबंदीचे काम देताना पालिकेने नियम, करार व अटींमध्ये या शर्ती समाविष्ट केलेल्या असतानाही यांना बिल दिले गेले व या संस्थांच्या मागे शहर भाजपच्या एका सरचिटणीसाचे लागेबांधे आहेत, असा योगेश बहल यांनी केलेला आरोप …हा आहे या स्टोरीचा साधा सरळ मुख्य विषय.
मागील आठवडयात झालेल्या महापालिका सभेत ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल यांनी पुराव्यासह या नसबंदीतून भाजपने कसा भ्रष्टाचार केला याची पोलखोल केली. महापौरांनीही या प्रकरणाचे चौकशीचे आदेश दिले. भाजपच्या भ्रष्टाचाराची दैनंदिन मालिका चालवित असलेल्या शहरातील एका पोर्टेलवर यानंतर दोन दिवसांनी योगेश बहल यांनी एक व्हिडीओ मुलाखतही दिली. प्रत्येक ठिकाणी बहल यांनी आरोप करताना कोणाचेही नाव घेतले नाही.भाजपच्या भ्रष्टाचाराबद्दल योगेश बहल हे सातत्याने प्रहार करत आहे व आता देखील त्यांनी भाजप कसा कुत्र्यांच्या नसबंदीतूनही पैसे खातो हे दाखविण्याचा प्रयत्न केला व या प्रकरणाशी शहर भाजपचा एक सरचिटणीस संबंधित असल्याचे म्हटले.
अनेकदा सत्ताधारी व विरोधक यांच्यामध्ये एकमेकांवर असे आरोप होणे वा प्रकरणे बाहेर काढणे, उकरणे या तशा नेहेमीच्या बाबी असतात.दोन दिवसांच्या चर्चेनंतर व आलेल्या बातम्या वाचून विसरून जाणे ही गेल्या कित्येक वर्षांची स्वाभाविक गोष्ट ठरत आलेली आहे.
हे नसबंदी प्रकरणही तशाच वाटेने जाईल असे भासत असताना शहर भाजपचे सरचिटणीस राजु दुर्गे यांनी मात्र फेसबुकवर येऊन स्वत:चा व्हिडीओ अपलोड करत बहल यांना ललकारले व कोणता सरचिटणीस संबंधित आहे याचे पुरावे सादर करण्याचे आव्हान दिले.
लढवय्ये असलेल्या व आक्रमक स्वभावाच्या दुर्गे यांनी भाषा प्रयोग करताना मात्र ताळतंत्र सोडला. मुळात बहलांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी ते एकटेच का पुढे आले? अन्य तीन सरचिटणीस यांनी मिठाच्या गुळण्या का धरल्या ? किंवा कोणाच्या सांगण्यावरून ते फेसबुकवर आले का? हे समजायला मार्ग नाही.
भाजपवर गेल्या दोन वर्षापासून धुव्वाधार बॅटींग होत असताना शहराध्यक्ष , प्रवक्ते , व प्रसिद्धी प्रमुख मात्र तोंडावर बोट ठेऊन आहेत.
ठिगळं इतकी झाली असताना हे झाकू की ते झाकू? अशी गत भाजपची झाली असताना आता खाजवून खरूज उकरण्याचं काम भाजपनं स्वत:हून हाती घेतल्याचं दिसतंय.
प्ररत्युत्तर म्हणून बहल यांनीही दुर्गे यांचा सभ्य भाषेत समाचार घेत बुधवारी ( ता.२४)ला रात्री फेसबुक व्हिडीओ व्हायरल केला.त्यामध्ये एकत्र येऊन नसबंदीच्या टाक्यांच्या टोकापर्यंत येण्याचे आव्हान दुर्गे यांना दिले आहे.
बहलांना नडण्याचे प्रयोग या अगोदर लक्ष्मण जगताप, विलास लांडे यांच्यासह अनेकांनी करून पाहिले आहे.बजाज अॅटोत साधे कामगार म्हणून आयुष्याची सुरूवात केलेले बहल आज इतके साम्राज्यशाली कसे झाले? असा थेट हल्ला आमदार जगताप यांनी २०१५ मध्ये बहलांवर केला होता व मी शेती तसेच वडिलोपार्जित इस्टेटीवर मोठा झालो तसं बहल कशावर मोठे झाले , हे सांगावं ? असेही आव्हान जगतापांनी तेव्हा दिले होते. हे प्रकरण तेव्हा वाढतं की काय असं वाटत असताना बहल यांनी शांत राहणंच तेव्हा पसंत केले होते. पुढे मात्र २०१७ मधील योगेश बहल यांच्या वाढदिवसाला जगतापांनी संत तुकाराम नगर मध्ये येऊन बहलांना शुभेच्छा दिल्या होत्या. राजकारणात मित्र आणि शत्रू कधीच कायमचा नसतो हे तेव्हा दिसून आलं होतं. आता नव्याने राजू दुर्गे बहलांना आव्हान देण्याच्या त्या रांगेत आले आहेत इतकंच…!
एकूणच नसबंदी प्रकरणात चुकीच्या पध्दतीने बिले अदा केली काय? तर ते शंभर टक्के सत्य आहे. भाजप सरचिटणीसाचा या बिलांच्या गाॅटमॅटशी संबंध असो वा नसो पण मूळात नसबंदी झालेलीच नाही ,आणि जर झाली असेल तर पुरावे दया,ही राष्ट्रवादीची मुख्य मागणी आहे. बिले काढणारे प्रशासनातले सगळेच आज ना उदया लटकणार हे नक्की असलं तरी कोणाच्या दबावापुढं बाबू मंडळी वाकली हे सिध्द होणं गरजेचे आहे. त्यामुळे आता पालिका प्रशासनाला लवकरच नसबंदीचे टाके उसवावे लागणार आहेत .पण जर टाके उसविल्यानंतर कुत्र्यांची नसबंदी झालीच नाही हे सिध्द झालं तर जनता मात्र कोणाला टाके घालायचे हे आगामी निवडणूकीत ठरवणार हे मात्र नक्की…!