( विजय जगताप)
शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख असलेले गजानन चिंचवडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचा इतका आनंद शहर भाजपला झालाय की मोठी शिकार केल्याचा डरकाळी सोशल मिडियातून गेल्या दोन दिवसांपासून फोडली जात आहे.
सध्या पिंपरी पालिकेत सत्ता असूनही जात्यामध्ये भरडत असल्याची स्थिती भाजपची झालेली आहे. लाचलुचपत धाडीत भाजपच्या अब्रूचे धिंडवडे ताजे असतानाच मागील काही दिवसात राजू लोखंडे, भाजप नगरसेविकेचे पती संतोष बारणे, भाजप संलग्न अपक्ष नगरसेवक कैलास बारणे, तर कालच वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य संभाजी बारणे यांनी थेटपणे तर भोसरीतील रवि लांडगे तसेच चिखली व पिंपरीगाव येथील दोन नगरसेवकांसह भाजपला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत किमान दहा तरी विद्यमान नगरसेवक रांगेत आहेत. शिवाय भाजप सत्तेत पदे भोगून ढेकर दिलेले काही जण आता खुलेआम राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसू लागल्याने शहर भाजप तशी अलिकडच्या काळात चिंताक्रांतच होती. या अशा गंभीर वातावरणात अचानक सेनेचे जिल्हा प्रमुख असलेले गजानन चिंचवडे यांनी परवा कमळ हाती धरले, आणि आमदार लक्ष्मण जगताप यांचे ब-याच कालावधीनंतर हर्षवायू झाल्याचे फोटो सोशल मिडियात व वृत्तपत्रात झळकू लागले.
जगताप यांना गेल्या पंधरा वर्षापासून ठसठस करणारी कोणती जखम असेल तर ती म्हणजे श्रीरंग बारणे हे नाव होय. याच बारणे यांचा उजवा हात म्हटले जाणारे गजानन चिंचवडे थेट भाजपात जातात याचे राजकीय वर्तुळाला व मिडियाला धक्का बसणे साहजिकच असले तरी या प्रवेशा मागचं खरं इंगित व वास्तव चित्र मात्र फार वेगळं आहे.
गजानन चिंचवडे यांचा राजकीय प्रवास २५-२६ वर्षांपूर्वी राजाभाऊ गोलांडे यांच्याकडे मुळाक्षरे गिरविणे व नंतर त्यांच्या बरोबरीने सुरू झाला. गांधी पेठ तालीम मित्र मंडळ, तेथील गणेशोत्सव, आणि श्रीरंग आप्पा बारणे, भाऊसाहेब भोईर या नात्यागोत्याच्या व मित्र मंडळींच्या गोतावळयात गजानन चिंचवडे यांचे हळूहळू राजकीय बस्तान बसले.सर्वप्रथम पीसीएमटी सदस्य, पुढे शिक्षण मंडळ सदस्य आणि मग बारणेंच्या सेना प्रवेशानंतर त्यांचेही सेनेत जाणे सहज बाब ठरली. सेनेतही आप्पांचे खास म्हणून लवकरच त्यांची हवा निर्माण झाली .पदांची चढती कमान घेत ते हळूहळू जिल्हाप्रमुख पदापर्यंत धडकले.या दरम्यान ,त्यांच्या पत्नी अश्विनीताई या दोन वेळा शिवसेनेच्या तिकिटावर नगरसेविका म्हणून निवडून आल्याने त्यांच्या पंखात अजून बळ व भरारी आली. पालिकेत पत्नी नगरसेविका, स्वत: जिल्हा प्रमुख , तसेच खासदार सदैव चोवीस तास पाठिशी…अशी पाचही बोटे तुपात असली तरी चिंचवडे यांच्या व्यक्तिमत्वाचा ठसा जिल्हा तर लय लांब आकुर्डीतही उमटत नव्हता. याला कारण म्हणजे सेनेचा शहरात असलेला तोळामासा जीव…! संयमी व अभ्यासू अशी चिंचवडेंची प्रतिमा असली तरी शिवसेना स्टाईल करारीपणा, वा धडाकेबाजपणा त्यांच्या वागण्याबोलण्यात कधीच नव्हता.तो त्यांच्या व्यक्तिमत्वाचा भागच नव्हता.
सेनेचेही शहरातील दूर्दैव असे की ,गेल्या ४० वर्षापासून पिंपरी चिंचवडमध्ये सेनेला लागलेला गटातटाचा शाप म्हणजे जणू पाचवीला पुंजल्यासारखा…!
गजानन बाबर, बाजीराव लांडे,बाबा धुमाळ ही नावे सोडली तर सेनेच्या नावाने कापरं भरेल …असं नेतृत्व व व्यक्तिमत्व अजुनपावेतो शहरात तयार झालेलं नाहीय.त्यामुळे सेना ना शहरात वाढली ना विस्तारली. परिणामी जिल्हाप्रमुख असूनही चिंचवडे यांचा ना वकूब वाढला ना रूबाब…! ओसाड गावच्या पाटीलकी सारखंच हे जिल्हा प्रमुख पद मिरवण्याचा प्रकार होता.
मुत्सद्दी असलेल्या चिंचवडे यांनी भाजप प्रवेशाचंही अचूक टायमिंग साधलंय. त्यांनी निवडणूकीच्या ऐन तोंडावर प्रवेश केला असता तर चव राहिली नसती व स्वार्थ दिसून आला असता….! बहुसंख्य जणांना प्रश्न पडला असेल की इतकं चांगलं गुण्यागोंविंदात सेनेत चाललं असताना , सगळं काही आलबेल असताना त्यांनी आप्पा बारणे यांची साथ सोडून भाजपमध्येच प्रवेश का केला? राष्ट्रवादीत का नाही केला?
यामागचं खरं कारण व इंगित पालिका निवडणूकीत दडलंय….अश्विनीताई दोन वेळा चिंचवडमधून याअगोदर निवडून आलेल्या आहेत. त्यांची निवडून येण्याची व मतदान खेचण्याची सारी चाणक्यीय सूत्रे गजानन चिंचवडे हलवित. चिंचवडगावातील भाजप आणि विशेषत: संघाच्या मंडळींशी त्यांचा खास दोस्ताना…! ते सेनेत असले तरी वैयक्तिक संबंध व गहरी यारानामुळे मते मिळण्यात त्यांना अडचण नसे. जरी भाजप व सेना पालिका निवडणूकीसाठी कायम स्वतंत्र लढत आल्या असल्या तरी या वैयक्तिक संबंधांचा उपयोग हमखास वोटींगसाठी ठरलेला असे.
राज्यात व केंद्रात सेना -भाजप सदैव एकत्र असल्याने स्थानिक पातळीवर चिंचवडे सेनेचे असूनही कट्टर भाजपवाल्यांची मते मिळण्यात अडचण नसायची. अशी सारी गाडी सुरळीत चालली असतानाच २०१९ मध्ये सेना-भाजपचं फाटलं. उध्दव ठाकरेंनी काँग्रेस व राष्ट्रवादीशी नवी मैत्री केली आणि संपूर्ण महाराष्ट्रातील भाजप व संघ मंडळींच्या कपाळात उध्दव ठाकरे जे बसले ते अजून काही उतरायला तयार नाही. आज राज्यात सर्वाधिक आमदार असूनही आपण सत्तेवर नाही याची अस्वस्थता भाजप व संघ मंडळींना प्रचंड छळत आहे. त्यामुळे पिंपरी पालिका निवडणूक अवघ्या १२० दिवसांवर आली असताना ठाकरेंच्या सेनेचा ‘कार्यक्रम’ करण्याचा विडा भाजपच्या चाहत्यांनी आताच उचलला आहे.आणि अशा स्थितीत आपलं सेनेत राहणे म्हणजे राजकारणातून आपण संपण्याचाच प्रकार आहे हे ओळखून चिंचवडेंनी कमळ हाती घेतले असावे असा बातमी खासचा निष्कर्ष आहे.
कारण मोरया गोसावी मंदीर परिसर, मंगलमूर्ती वाडा, चिंचवड गावठाण परिसर, राम मंदीर एरिया येथे सुमारे साडेसहा हजार फिक्स भाजपचा मतदार आहे. जो जीव गेला तरी भाजप सोडणारा नाही. व भाजपने दगड दिला तरी त्याला निवडून आणणारा आहे.आणि याच पाॅकेट वोटबरोबर चिंचवडे यांचे असलेले घरगुती संबंध पाहता म्हणूनच त्यांनी भाजपचे बोट धरले आहे.सेनेत असूनही स्थायी मिळाली नाही, गटनेतेपद मिळाले नाही या नाराजीच्या छटा पण त्यास जरूर आहे, पण त्या केवळ तोंडी लावण्यापुरत्या…!
सेनेतच राहिलो तर चिंचवडगावातून लढताना पराभव अटळ आहे त्यामुळे आप्पा बारणेंचा उजवा हात असण्यापेक्षा आपली नगरसेवकपदाची होडी नदीत स्थिर असण्याला चिंचवडेंनी आता सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.
सेना जरी सोडली असली तरी त्यांनी आप्पांवर वा सेनेतील मंडळीवर तसेच सेना कामकाज पध्दतीवर बिल्कुल नाराजी व्यक्त केलेली नाही, यातच सारं काही रहस्य दडलेलं आहे.
शहर भाजप मात्र सेनेचा जिल्हाप्रमुख आपल्यात आल्याच्या आनंदात मश्गुल आहे.
एकूणच चिंचवडेंच्या जाण्यामुळे सेनेचे नुकसान झाले का ? तर याचे उत्तर ‘बिल्कूल नाही ‘असेच आज देता येईल.आज आप्पा खासदार असले तरी शहराचा गाडा हाकताना त्यांनाही पक्षनेतृत्वाकडून शहरात वेसन घालण्यात आली आहे.( हा मोठा विषय आहे )फक्त चिंचवडेंच्या जाण्याने आप्पांच्या दरबारातील खास स्थान असलेले मुनीमजी कम दिवाणजी व काही प्रमाणात बिरबलची भूमिका वठवणारे एक जण निघून गेले याच्या पलिकडे या घटनेस विशेष महत्त्व नाही.