( विजय जगताप)
अवघ्या १८० दिवसांवर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर अजितदादा पवार यांचा वाढदिवस शहर राष्ट्रवादीच्या मदतीला निमित्तमात्र ठरला आहे.आज ( शुक्रवार ) दोन वजनदार मंत्र्यांची शहरात असलेली उपस्थिती यामुळे सामाजिक उपक्रमांचा या पक्षाने धुराळा उडवून टाकला.
कोरोनाचे संकट तसेच सर्वत्र जमावबंदीचे आदेश असल्याने तोंडावर आलेल्या महापालिका निवडणूकांना सगळे राजकीय पक्ष आता कसे सामोरे जाणार हा मोठा प्रश्न होता.राज्यातील दोन दिग्गज नेते अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांचे वाढदिवस एकाच दिवशी काल ( २२ जुलै) होता. विशेष म्हणजे या दोन्ही नेत्यांनी आपला वाढदिवस साजरा करू नये, खर्च टाळावा ,असे अगोदरच आवाहन केले होते.पिंपरी चिंचवड शहरात भाजपची सत्ता असल्याने व आपल्या नेत्याने आवाहन केल्याने शहर भाजपने फडणवीसांचा वाढदिवस फक्त सोशल मिडियात शुभेच्छा देऊन साजरा केला. मात्र आपली गेलेली हुकूमत व सत्ता परत आणण्याच्या उद्देशाने कामाला लागलेल्या राष्ट्रवादीने वाढदिवसाच्या संधीचे सोनं करण्याचा निर्णय घेतला. शहरभर अजितदादांचे होर्डिंग्ज व वृत्रपत्रांना जाहिराती देऊन इच्छुकांनी व विद्यमान नगरसेवकांनी शहरभर झाकोळ पसरून टाकला. माजी नगरसेवक राजेंद्र जगताप व मराठवाडा जनविकास मंचचे अरूण पवार यांनी रक्तदान शिबिर भरवून ४०५ बाटल्यांचा विक्रम केला.त्याचबरोबर अन्य मंडळींनी सामाजिक उपक्रमांचीही त्यास जोड देत भान व ज्ञान ही एक प्रकारे दाखवून दिले.
जलसंपदामंत्री जयंत पाटील हे नगरसेविका सुलक्षणा धर यांनी आयोजित केलेल्या रूग्णवाहिका लोकार्पण, या कार्यक्रमाच्या निमित्ताने वायसीएम हाॅस्पिटलला आले तर आरोग्यमंत्री राजेश टोपे हे प्राधिकरणातील स्टरलिंग हाॅस्पिटलमध्ये अपंगांना कृत्रिम अवयव देण्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले.या दोन्ही कार्यक्रमांना अजित पवार यांच्या वाढदिवसाची जोड होती.
नुकतेच शहर भाजपचे अध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी शंभरी पार नगरसेवक निवडून आणण्याचा केलेला संकल्प, तर मागील आठवडयात शहरात आलेले शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी पिंपरीत शिवसेनेचा महापौर आणण्याची केलेली घोषणा पाहता सगळयांनीच आता निवडणूक किती गांभिर्याने घेतली आहे हे दाखवून देणारी ठरली आहे.
शहरात काॅग्रेस पक्षाने कात टाकली असली तरी अध्यक्षपदाचे ठेवलेले भिजत घोंगडे पक्षात चैतन्य निर्माण करण्यास अडथळा ठरत आहे . तर मनसेचे इंजिन एकटे सचिन चिखले चालवित पक्षात प्राण आणण्याच्या कामाला लागले आहे.
शहरातील भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते नंदू भोगले यांना याविषयी छेडले असता, ‘ आमच्या पक्षात आदेशाचे पालन केले जाते.फडणवीसांनी सांगितले वाढदिवस करू नका मग तो कोणीच करणार नाही, निवडणूक जिंकण्यासाठी आमची कामे बुथ पातळीवर सुप्तपणे सुरू आहेत’ असे भोगले यांनी स्पष्ट केले.
तर राष्ट्रवादीचे प्रवक्ते फजल शेख म्हणाले की, आम्ही फक्त सामाजिक उपक्रम जोरदारपणे राबविले व कोरोना काळ असल्याने वास्तविक त्याची गरज होतीच , राहिला मुद्दा होर्डिंग्जबाबतचा तर अजित दादा यांना शुभेच्छा दयाव्यात ही सामान्य कार्यकर्त्याची तळमळ असते व दादांचे या शहराशी नाते असल्याने होर्डिग्ज झळकणे हे कृत्रिम वाटत नाही’.
तर शहरातील ज्येष्ठ पत्रकार माधव सहस्त्रबुध्दे यांनी आपले निरीक्षण नोंदविताना म्हटले की, या शहरात अजितदादा हे राष्ट्रवादीच्या मंडळींसाठी टाॅनिक व बुस्टर आहे तसे फडणवीसांचे या शहरातील भाजपच्या कार्यकर्त्यासाठी महत्व शून्य आहे.लक्ष्मण भाऊ व महेशदादा यांना मानणारा वर्ग हीच येथे मोठी ॲसेट आहे. या दोघांनीही मनात आणले तसे होणार , त्यामुळे येथे भाजप पक्ष तसेच फडणवीस हा भाग केवळ निमित्त आहे’
शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन भोसले यांनीही ,पक्ष आदेशा प्रमाणे शिवसंपर्क अभियान मोहिम शहरात जोरात सुरू केली आहे.येत्या २७ जुलैला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा वाढदिवस असल्याने सेनेनेही हा वाढदिवस सामाजिक उपक्रमाच्या मांडवाखालून जात साजरा करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.